---Advertisement---
जामनेर : तालुक्यातील खादगाव येथे एका ५० वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दिनकर मधुकर पाटील (वय 50 रा. खादगाव ) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तगादा लावल्याने पाटील यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेरच्या खादगाव येथे मृत दिनकर मधुकर पाटील (वय 50) आपल्या परिवाजासह वास्तव्याला होते. त्यांनी एका बँकेकडून गृहकर्ज घेतले होते. शुक्रवारी ( दि. 19 डिसेंबर) बँकेचे वसुली कर्मचारी पाटील यांच्या घरी आले होते. या वेळी पाटील व बँक कर्मचाऱ्यांमध्ये मोठे शाब्दिक वाद झाले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी वसुली करून, गेल्यावर पाटील यांनी आपले घर सोडले.
दरम्यान, त्यांनी जामनेरच्या लगत एमआयडीसी परिसरात आपले जीवन संपविले. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात मृत अवस्थेत दाखल केले, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांनी तपासणीअंती मृत घोषित केले.
याबाबत जामनेर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जयंत पगारे पुढील तपास करीत आहे.
गावात तीव्र संताप
दरम्यान, गृहकर्ज वसुली विभागातील कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून पाटील यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे बोलले जात असून, बँकेच्या या वसुली प्रणालीबाबत गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे.









