---Advertisement---
अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अजितदादांच्या विमान अपघाताच्या बातमीने केवळ राजकीय वर्तुळच नव्हे तर सामान्य जनतेलाही मोठा धक्का बसला आहे. राज्यभरात शोककळा पसरलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे.
राज्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांचे मतदान पार पडले असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत सुनील तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना थेट आवाहन केले आहे. निकाल अनुकूल लागला तरी कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा करू नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.
सुनील तटकरे यांनी त्यांच्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर पोस्ट करत म्हटले आहे की, जिल्हा परिषद निवडणुकांचे मतदान शांततेत पार पडले असून सर्व कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या शिस्तीबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. मात्र अजितदादांच्या निधनामुळे राज्य शोकाकुल आहे. त्यामुळे निकालानंतर विजय मिरवणुका, रोड शो, फटाके फोडणे, रंग उधळणे किंवा कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक जल्लोष टाळावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दिवंगत अजितदादांच्या स्मृतींना खरी श्रद्धांजली ही संयम, शिस्त आणि साधेपणा राखण्यात आहे. त्यामुळे सर्वांनी या आवाहनाचे पालन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून राजकीय वर्तुळातही त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.









