---Advertisement---
पंढरपूर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगपंचमीचा उत्सव अत्यंत भक्तिमय आणि रंगतदार वातावरणात साजरा करण्यात आला. विठुरायाच्या चरणी केशर आणि गुलालाची उधळण होताच मंदिर परिसर ‘अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग’ या अभंगाचा साक्षात अनुभव देत होता. भक्तांच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात हा उत्सव पार पडला.
रंगपंचमीच्या दिवशी दुपारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले, सदस्य संभाजी शिंदे, लेखाधिकारी मुकुंद अनेच्या यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या हस्ते विठुरायाच्या मूर्तीवर केशरयुक्त रंग व गुलाल अर्पण करण्यात आला.
रंगपंचमी निमित्त विठुरायास विशेष पोशाख परिधान करण्यात आला होता. देवाच्या मुकुटाऐवजी पांढऱ्या रंगाचा पगोटा बांधण्यात आला होता. त्यानंतर देवाच्या अंगावर केशरयुक्त रंग आणि गुलाल टाकून पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. या सोहळ्यामुळे विठुरायाचे रूप अधिकच लोभस आणि आकर्षक दिसत होते. जणू संतांनी वर्णन केलेल्या राजस आणि सुकुमार विठ्ठलाचे दर्शन भक्तांना लाभत होते.
मंदिरातील पारंपरिक प्रथेनुसार दुपारच्या पूजेनंतर मंदिरातील गरूडखांब, नामदेव पायरी, पश्चिम दरवाजा तसेच मंदिर प्रदक्षिणा मार्गावर टाळ-मृदंगाच्या गजरात रंगांची उधळण करण्यात आली. या रंगोत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देवाच्या नावाच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते.
वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक असलेल्या रंगपंचमीचा हा उत्सव मंदिरात विशेष महत्त्वाने साजरा केला जातो. वसंतोत्सवाच्या प्रारंभापासून रंगपंचमीपर्यंत दररोज विठुरायाला विविध पोशाख परिधान करून पूजा केली जाते. या सोहळ्याचा समारोप रंगपंचमीच्या दिवशी गुलाल उधळून करण्यात येतो. त्यामुळे हा रंगोत्सव भक्तांसाठी अत्यंत आकर्षणाचा ठरतो.
रंगपंचमीच्या या सोहळ्यामुळे पंढरपूर नगरीत भक्ती, आनंद आणि रंगांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. विठुरायाच्या चरणी अर्पण झालेल्या रंगांनी जणू भक्तांच्या मनातही भक्तिभावाचा रंग चढवला आणि ‘अवघा रंग एक झाला’ हा संतवाणीतील भाव प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.









