---Advertisement---
पाळधी (ता. धरणगाव) येथे कत्तलीसाठी आणण्यात आलेल्या पाच गायी आणि एका वासराची पोलिसांनी वेळेत कारवाई करत सुटका केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
२ मार्चच्या मध्यरात्री पोलिसांची गस्त सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांना अमोल धोबी यांनी मोबाईलवरून माहिती दिली. नमरा कॉलनी परिसरात काही गुरे कत्तलीसाठी आणून वाहनातून उतरवली जात असल्याची खबर मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अमोल धोबी, संदीप खंडारे, निंबा धनगर, कल्पेश पाटील, बावीस्कर तसेच पंच म्हणून पंकज चौधरी, गणेश शिंदे, मयूर व्यास आणि ऋषिकेश सोनार यांच्या उपस्थितीत तपास करण्यात आला. घटनास्थळी उभी असलेल्या पिकअप व्हॅनमध्ये पाच गायी आणि एक वासरू आढळून आले. सर्व जनावरांना सुरक्षित बाहेर काढून महागणपती परिसरातील गोशाळेत हलविण्यात आले.
पोलिस येत असल्याचं लक्षात येताच जाफर कुरेशी, अझर कुरेशी आणि त्यांचा एक भाऊ (नाव अज्ञात) हे तिघे पळून गेले. या प्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक सुनिल लोहार करत आहेत.









