---Advertisement---
Amalner News : तालुक्यातील टाकरखेडा येथे प्रेमविवाहाच्या जुन्या वादातून एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात पती, पत्नी, मुलगा आणि भावासह ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अमळनेर येथील नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या आयसीयूम ध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींची मुलगी कीर्ती हिने ६ मार्च २०२६ रोजी गावातीलच कलेश भगवान पाटील याच्याशी प्रेमविवाह केला होता. या विवाहाचा राग मनात धरून संशयित आरोपी भावेश पाटील व धनंजय पाटील हे फिर्यादींना वारंवार धमक्या देत होते. २० एप्रिल रोजी दुपारी आरोपी जितेंद्र पाटील व धनंजय पाटील हे फिर्यादींच्या घराजवळ पाहणी करत होते. त्यावेळी झालेल्या वादात महिलेला शिवीगाळ करण्यात आली. रात्री या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. रात्री ९ वाजता संशयितांनी घरावर हल्ला चढवला.
यावेळी जगदीश भास्कर पाटील (रा.कंडारी) यांनी दरवाजा वाजवून घरात घुसत फिर्यादीवर धारदार शस्त्राने वार केला. पतीला वाचवण्यासाठी आलेल्या पत्नी सुनिता यांच्या हातावरही वार करून त्यांना जखमी करण्यात आले. तसेच मुलगा दर्शन यालाही विकास पाटील, जितेंद्र पाटील व पंकज पाटील यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनाही मारहाण करण्यात आली. पांडुरंग पाटील व त्यांचा पुतण्या प्रफुल्ल यांना लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली. अविनाश पाटील, भावना पाटील व मयूर पाटील यांनी दगडफेक करून जखमी केले. नागरिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
या प्रकरणी जगदीश भास्कर पाटील, भावेश पाटील, धनंजय पाटील, जितेंद्र पाटील, भगवान पाटील, अविनाश पाटील, मयूर पाटील, पंकज पाटील, विकास पाटील, कविता पाटील, भावना पाटील व संगीता पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संदेश पाटील व संतोष पवार करत आहेत.









