---Advertisement---
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यातच माजी मंत्री बच्चू कडू यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. त्यांनी थेट शिंदेंच्या शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ हाती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हा निर्णय घेतला आहे. “प्रहार संघटना कायम राहील, पण शिवसेनेला बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू,” माझी मंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या संदर्भात त्यांनी सूचक विधान करत धनुष्यबाण हाती घेण्याची तयारी दर्शवली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी आणि दिव्यांगांसाठी लढा सुरूच राहील, असेही त्यांनी नमूद केले. “शिवसेनेची ताकद वाढवताना शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर कोणताही समझोता होणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतूनच झाल्याचे सांगत, पुन्हा एकदा त्याच पक्षाच्या चिन्हाखाली काम करण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या या निर्णयाचा राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









