विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील एक हळुवार कप्पा असतो. जीवनातील चढ उतारामध्ये जीवनसाथी हा महत्वाचा असतो. एकीकडे विवाह बंधनात न अडकता लिव्ह इन रिलेशशीपमध्ये राहण्यास तरुणाईकडून पसंती दिली जात आहे. परंतु , विवाह संस्था आजही टाकूनही आहे. राजस्था
नमधील आदिवासी बहुल भागातील डुंगरपूर जिल्ह्यतील गलांदर गावात अशीच एक घटना समोर आली आहे. याच काळात ७० वर्षांपासून लिव्ह इन रिलेशशिपमध्ये राहणाऱ्या एक जोडप्याने लग्नबंधनात अडकणे पसंत केले आहे. अनेक दशकं एकमेकांसोबत राहिल्यानंतर जोडप्याने त्यांच्या प्रेमाचा सन्मान करण्यासाठी अखेर त्यांच्या शेवटच्या काळात लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय का घेतला हे आता आपण जाणून घेऊया.
९५ वर्षीय रामा भाई खरारी आणि ९० वर्षीय जीवाली देवी हे ७० वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. हे दोघे गलांदरमध्ये वास्तव्यास आहेत. ७० वर्षांपासून एकत्र राहिल्यानंतर त्यांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. विशेष बाब म्हणजे त्यांच्या मुलांनी पुढाकार घेत त्यांचे लग्न थाटामाटात लावून दिले.
रामा भाई खरारी आणि जीवाली देवी यांनी घर आणि आयुष्याची विभागणी केली होती. त्यांना सहा मुलं असून, त्यातील चौघे सरकारी पदांवर कार्यरत आहेत. त्यांचा सर्वात मोठा मुलगा ६० वर्षांचा आहे. आज त्यांच्या सर्व मुलांची लग्न झाली असून, आपला संसार सांभाळत आहेत.
नुकतंच या जोडप्याने अधिकृतपणे लग्न करण्याची आपली इच्छा व्यक्त केली होती. यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांच्या लग्नासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यांच्या लग्नाचा उत्सव संपूर्ण गावात साजरा करण्यात आला. जोडप्याची बिंदौली (पारंपारिक लग्नापूर्वीची मिरवणूक) संगीत आणि नृत्याने रंगली, ज्यामध्ये गावकरी आणि जोडप्याची मुलं सामील झाली. सप्तपदीनंतर, नवविवाहित जोडप्याच्या सन्मानार्थ एक सामुदायिक मेजवानी आयोजित करण्यात आली.
या घटनेने एक गोष्ट मात्र सिद्ध केली आहे की, प्रेमाला वय नसतं. एखाद्या व्यक्तीवर विश्वास आणि प्रेम असेल तर तुम्ही संपूर्ण आयुष्य फक्त त्याच्या सोबतीने घालवू शकता.