जळगाव : कपाशी पिकाची लागवड केली, परंतु निसर्गाने साथ दिली नाही. उत्पन्न जेमतेम आले, पण कपाशीला भाव नाही. बाहेरून लोकांचे उसनवारीचे पैसे कसे द्यावे, या चिंतेतून एका २६ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना एरंडोल तालुक्यातील निपाणे येथे उघडकीस आली. श्रीराम सखाराम राठोड (२६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
एरंडोल तालुक्यातील निपाणे येथे शेतकरी श्रीराम सखाराम राठोड (२६) आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. श्रीराम राठोड यांना एक नऊ महिन्यांची मुलगी आहे. मागील वर्षी शेतात कपाशी पिकाची लागवड केली, परंतु निसर्गाने साथ दिली नाही. उत्पन्न जेमतेम आले, पण कपाशीला भाव नाही. बाहेरून लोकांचे उसनवारीचे पैसे कसे द्यावे, याचे नेहमी विचार करत असे. वृद्ध आई आणि पत्नी श्रीराम राठोड यांना धीर देत होते, परंतु ते नेहमी चिंतेत राहत असे.
श्रीराम सखाराम राठोड यांनी दि. ८ रोजी सकाळी घराला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब श्रीराम राठोड यांच्या पत्नीला दिसताच त्यांनी हंबरडा फोडला. यावेळी आजूबाजूचे लोक जमा झाले. कासोदा पोलिस स्टेशनला या घटनेची खबर देण्यात आली.
कासोदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नीलेश राजपूत व सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यांचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. श्रीराम यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, लहान भाऊ, मुलगी असा परिवार आहे.