Earthquake : अमरावती जिल्ह्यातील डोंगराळ भागातील मेळघाटासह जळगाव जिल्ह्यातील काही भागांना या भूकंपाचे धक्के जाणवले त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली. या भागात सातत्याने जमीन हादरत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे.
अमरावतीमधील मेळघाटमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भूकंपाचा झटका जाणवला. काल रात्री ९ वाजून ५७ मिनिटांवर ३.८ तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या भूकंपाची तीव्रता जास्त नसली तरी जमीन हादरल्याने नागरिक घराबाहेर आले होते. नागरिकांना भूकंपाची जाणीव झाल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने 3.8 तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती दिली आहे. या भूकंपाचे केंद्र हे मेळघाट परिसर होते की इतर याची माहिती अजून समोर आलेली नाही.
गेल्यावर्षी सप्टेंबर मध्ये अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, अचलपूर या तालुक्यांसह काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. अचानक जमीन हलल्यामुळे अनेकांची भीतीने गाळण उडाली होती. अनेकजणांनी घराबाहेर धाव घेतली होती. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. जमीन हादरल्याचे नागरिकांना स्पष्टपणे जाणवले होते. काही ठिकाणी घरांना चांगलेच हादरे बसले होते. तर मेळघाटातील चिखलदारा येथील काही घरांना त्यावेळी तडे गेले होते.
आता मेळघाटात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिक चिंतेत आहे. हे धक्के तीव्र नसले तरी त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. या ताज्या धक्क्यांनी काही नुकसान झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मेळघाटासह जळगाव जिल्ह्यातील काही भागांना या भूकंपाचे धक्के जाणवले. जळगाव जिल्ह्यातील रावेर, खानापूर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. कुठेही काही हानीची माहिती नाही. रावेर तहसीदारांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा दिला असून या भूकंपाचा केंद्र बिंदू अमरावती असून सुमारे तीनशे ते चारशे किलोमीटर पर्यंत धक्के जाणवले आहे. भूकंपाची तीव्रता ३.८ रेक्टर स्केल एवढी असल्याची नोंद करण्यात आली आहे