---Advertisement---
---Advertisement---
उत्तर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या जळगाव विमानतळाच्या सर्वांगीण विस्तारासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता उदय वाघ यांनी नवी दिल्ली येथे नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व अधिकाऱ्यांसहित बैठक घेऊन विस्तृत चर्चा करून निवेदन सादर केले.
या निवेदनात विमानतळाच्या धावपट्टीपासून टर्मिनल व एप्रनच्या विस्तारापर्यंत महत्त्वाच्या मागण्या ठेवण्यात आल्या. खासदार वाघ यांनी मुख्य मुद्दे उपस्थित केले. यात धावपट्टीचे समतलीकरण करून अडथळे दूर करणे व लैंडिंग अधिक सुरक्षित करणे, प्रवासी संख्येनुसार टर्मिनलचा तातडीने विस्तार करणे, एकाचवेळी तीन एटीआर विमाने थांबू शकतील असा एप्रन विस्तार करणे, मास्टर प्लाननुसार नवीन टर्मिनलसाठी तातडीने निधी मंजूर करून काम सुरू करणे या मुद्यांचा समावेश आहे.
उत्तर महाराष्ट्राची औद्योगिक गती
खासदार वाघ यांनी सांगितले की, एप्रिल २०२४ पासून फ्लाय ९१ व अलायन्स एअरने सेवा सुरू केल्यानंतर जळगाव विमानतळावर प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. हे विमानतळ आज जळगाव, धुळे, बुलडाणा, अजिंठा लेणी, तसेच मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूरसारख्या सीमाभागातील १ कोटीहून अधिक लोकसंख्येसाठी केंद्रबिंदू ठरले आहे. जळगाव विमानतळ हे महाराष्ट्रात ५ व्या क्रमांकाचे आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरनंतर जळगावचा नंबर लागतो.
प्रवासी संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. केंद्र सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित असून, त्यानंतर जळगाव विमानतळाचा विस्तार निश्चित होईल. हा निर्णय केवळ हवाई दळवळणापुरता मर्यादित न राहता, उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटन, व्यापार, कृषी व औद्योगिक विकासास गती देणारा टर्निंग पॉईंट ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.