---Advertisement---
चंद्रशेखर जोशी
निसर्ग लहरी असतो…या लहरीपणाचा सर्वाधिक फटका बसत असेल तर तो बळीराजाला. ऋतू येतो आणि जातो… पण या कालखंडात निसर्गाच्या लहरीपणाचा जो फटका बसतो तो हादरवून सोडतो. उन्हाळा जसा संपत येतो तशी बळीराजाची धडपड सुरू होते. एक चैतन्य, उत्साह त्याच्यात संचारतो. तो स्वप्न पाहू लागतो… की यंदाचा खरीप हंगाम चांगला येणार… शेत शिवार चांगले बहरणार… या उत्साहाने तो जोमाने कामाला लागतो. जूनच्या प्रारंभापर्यंत त्याची सर्व कामे आटोपतात. दिवाळीत अर्धांगिनीला हौसेने केलेले दागिने मोडून तो पेरणीचे साहित्य खरेदी करतो.
पीक चांगले बहरावे म्हणून खते आणून ठेवतो… पहाता… पहाता मृग नक्षत्र येते… आणि त्याचे डोळे आकाशाकडे लागतात. नभात ढग जसजसे जमू लागतात तसतसे हे मेघ कधी बरसतात याकडे त्याचे लक्ष लागते. ढगांची गर्दी त्याला आशादायक वाटते… ढगांचा गडगडाट… विजांचा कडकडाट… याची पर्वा न करता तो शेतात ठाण मांडून असतो… नभांगणातील ढगांची गर्दी हळू हळू विरळ होते… पावसाची हुलकावणी त्याला अस्वस्थ करते… दिवसांमागून दिवस जातात पावसाच्या धारा बरसतील या अपेक्षेतील या राजाचे डोळे पाणावतात. ‘पड रे पावसा.. पड रे पावसा’ करता करता त्याच्या डोळ्यातून अश्रू टपकतात… जून पूर्ण कोरडा जातो अन् जुलैत पावसाला सुरूवात होते… हळू हळू पेरण्या आटोपतात… पिके बहरू लागतात… आणि पुन्हा पाऊस विश्रांती घेतो… पर्जन्याची ही विश्रांती त्याला अस्वस्थ करते… कारण पावसाअभावी पिकांची वाढ खुंटते… पाहीलेल्या स्वप्नांचा चुराडा होतोय की काय? अशी भिती त्याच्या मनात भरते. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात प्रचंड पाऊस बरसतो. होत्याचे नव्हते होतांना उघड्या डोळ्यांनी बघावे लागते. उभी पिके पाण्याखाली जातात. कर्ज काढून वाढविलेली पिके अशा अवस्थेत बघून काय अवस्था होत असेल त्या बळीराजाची, कल्पना करवत नाही.
आणि मग चिंता पडते भविष्याची काय करावे… कसे करावे… या विवंचनेत असताना त्याच्या डोक्यात नाही… नाही ते विचार सुरू होतात. कारण निसर्गचक्र हे असेच असते… दरवर्षी काही ना काही समस्या उभी रहाते… कर्जाचा डोंगर वाढत जातो… सरकार मदत करते, मात्र ती तुटपुंजी असते. त्यात वार्षिक खर्च भागणार कसा? या विवंचनेत हा राजा नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलतो.
शेतकरी आत्महत्या हा विषय गंभीर झाला आहे. मदतीचे अनेक हात पुढे येताय यात शंका नाही, मात्र त्यालाही मर्यादा आहेत. जिल्ह्याचा विचार करता जानेवारी २०२५ ते मे २०२५ या पाच महिन्यांच्या कार्यकाळात तब्बल ९० शेतकऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती आहे. १५० दिवसात ९० शेतकरी आत्महत्या करत असतील तर हा विषय अतिशय गंभीर आहे. बर मृत्युनंतर त्यांची संकट सुटतात काय ? याचे उत्तर दुर्दैवाने नकारात्मकच येते. या संकटातून सावरण्यासाठी शेतकरी कुटुंबियांना शासन योजनेतून मदत दिली जात असते, मात्र तेथेही लालफित आलीच. फार काही विचार न करता आमची शासकीय निष्ठुर यंत्रणा आलेले प्रस्ताव फेटाळून मोकळी होत असते. केवळ तांत्रिक कारणे देऊन हे प्रस्ताव फेटाळून संकटातील शेतकरी कुटुंबियांची अशा पद्धतीने अवहेलना केली जाते.
प्रशासकीय यंत्रणेच्या निष्ठुरतेचा हा कळस म्हणावा लागेल. जगाच्या पोशिंद्याची ही अवहेलनाच म्हणावी लागेल. आपण म्हणतो…
अन्नदाता सुखी भवः पण ज्याच्यामुळे आपल्याला अन्न मिळते त्याचे काय ? तो सुखी नाही.. नैराश्यातून आत्महत्या करतो… याकडे यंत्रणेने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. शासनाच्या कृषी हिताच्या एक नाही तर अनेक योजना आहेत, पण त्या या राजापर्यंत पोहोचतात काय ? कृषी खाते बांधावर जाण्याच्या गोष्टी करते; पण प्रत्यक्ष अंमलबजावणी होते काय ? आमची राजकीय मंडळी नुकसान झाल्यावर शेतात जाते… तेथील दृष्य पाहून दुखी बळीराजाचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न ही मंडळी करते, मात्र जेव्हा प्रत्यक्ष मदतीची वेळ येते त्यावेळी ही मंडळी गायब होते. जगाच्या पोशिद्यांची अशी ही अवहेलना वर्षानुवर्षे सुरू आहे. मग या दुष्टचक्रातून कायमच दूर जाण्यासाठी हा बळीराजा शेतातच झाडाला दोरखंड बांधुन जिवनयात्रा संपवितो.