NEET परीक्षेचा ताण….वडील मुलाचा वाद……वडिलांची हत्या…..मृतदेहाचे तुकडे निळ्या ड्रममध्ये……नेमकं काय घडलं?

---Advertisement---

 

उत्तर प्रदेशातील लखनौ शहर हादरवणारी घटना समोर आली आहे. 21 वर्षीय तरुणाने आपल्या 50 वर्षीय उद्योजक वडिलांची गोळी झाडून हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये लपवून ठेवले. सुरुवातीला ‘परीक्षेच्या ताणामुळे’ हत्या केल्याचा दावा करण्यात आला; मात्र सखोल तपासानंतर कौटुंबिक वाद, व्यवसायावरून मतभेद आणि तुटलेला विश्वास हे धक्कादायक कारण समोर आले आहे.

उत्तर प्रदेशातील काय आहे संपूर्ण प्रकरण?

मृत व्यक्ती मानवेंद्र सिंग हे मूळचे जालौन येथील रहिवासी होते. त्यांनी लखनौ मध्ये चार पॅथॉलॉजी लॅब आणि तीन दारूची दुकाने उभी करत यशस्वी व्यवसाय उभारला होता. पत्नीच्या निधनानंतर त्यांचा संसार मुलगा अक्षत आणि मुलगी क्रितीभोवती फिरत होता. मानवेंद्र यांची इच्छा होती की मुलगा डॉक्टर व्हावा. अक्षतने बारावीचे शिक्षण नामांकित La Martiniere कॉलेज मधून पूर्ण केले आणि NEET परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र दोन प्रयत्नांनंतरही यश न मिळाल्याने वडील-मुलामध्ये तणाव वाढू लागला.

अभ्यासाचा ताण की व्यवसायावरून वाद?

तपासात समोर आले की अक्षतचा कल कुटुंबाच्या व्यवसायाकडे अधिक होता. त्याला तत्काळ व्यवसाय हाती घ्यायचा होता; पण वडिलांना आधी व्यावसायिक शिक्षण महत्त्वाचे वाटत होते. यावरून वाद वाढत गेला. चार महिन्यांपूर्वी घरातील दागिने चोरीला गेल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती. सुरुवातीला नोकरांवर संशय घेतला गेला; नंतर संशय घरातील सदस्यांवर गेला. हे प्रकरण मागे घेतले गेले, पण वडिलांचा विश्वास डळमळीत झाला. त्यानंतर त्यांनी मुलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली—नात्यातील दुरावा आणखी वाढला.

20 फेब्रुवारीची पहाट… आणि रक्तरंजित शेवट

20 फेब्रुवारीच्या पहाटे वडील-मुलामध्ये पुन्हा वाद झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षतने परवानाधारक रायफलने वडिलांच्या डोक्यात गोळी झाडली. घटना तिसऱ्या मजल्यावर घडली. गोळीचा आवाज ऐकून बहिण घटनास्थळी पोहोचली; तिला गप्प राहण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सुरुवातीला गोमती नदीत टाकण्याचा विचार; पण मृतदेह जड असल्याने करवत आणून हात-पाय वेगळे केले. काही अवयव कारमधून सदरौना भागात फेकल्याचा संशय आहे. धड साठवण्यासाठी निळा ड्रम खरेदी करण्यात आला. घरातून ॲसिडही जप्त झाले आहे.

पोलिसांच्या तपासात कसा उलगडला कट?

21 फेब्रुवारीला मानवेंद्र सिंग बेपत्ता तक्रार नोंदवली गेली. सुरुवातीला अक्षतने “वडील बाहेर गेले” असा दावा केला; मात्र जबाबांतील विसंगतीमुळे पोलिसांचा संशय वाढला. फॉरेन्सिक तपासात रक्ताचे डाग, स्वच्छतेचे प्रयत्न आणि कारच्या डिकीत संशयास्पद खुणा आढळल्या. डीसीपी सेंट्रल विक्रांत वीर यांनी सांगितले की केवळ अभ्यासाचा ताण नव्हे, तर व्यवसायावरून वाद आणि तुटलेला विश्वास हेही कारणीभूत असल्याची शक्यता तपासात आहे.

मानवेंद्र सिंग यांचे वडील सुरेंद्र पाल सिंह हे उत्तर प्रदेश पोलीस दलातील निवृत्त अधिकारी आहेत. कुटुंबात कायद्याची पार्श्वभूमी असतानाही घडलेली ही घटना शहरासाठी धक्कादायक ठरली आहे. ही घटना केवळ ‘परीक्षेचा ताण’ म्हणून मर्यादित नाही. कौटुंबिक मतभेद, व्यवसायावरील स्वामित्वाची इच्छा, तुटलेला विश्वास आणि वाढता मानसिक तणाव यांचा स्फोटक संगम या हत्येमागे असल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे. लखनऊ शहराला हादरवणाऱ्या या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---