Jalgaon News : कत्तलीसाठी जाणाऱ्या ३४ म्हशींची पोलिसांकडून सुटका

रावेर :  कत्तलीच्या उद्देशाने जाणाऱ्या ३४ म्हशींची रावेर पोलिसांनी सुटका करीत ट्रक जप्त केला तर त्रिकूटाविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर-ब-हाणपूर रस्त्यावर खानापूर गावाजवळील आरटीओ चेक नाक्याजवळ अवैध गुरांची वाहतूक करणारी पोलिसांनी अडवल्यानंतर त्यात गुरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याचे आढळल्याने व कुठलाही वाहतुकीचा परवाना नसल्याने पोलिसांनी ३४ म्हशींची सुटका केली.

१० लाख २० हजार रुपये किंमतीच्या ३४ म्हशी व १५ लाख रुपये किंमतीचे ट्रक पोलिसांनी जप्त केले. याबाबत पोलीस कॉस्टेबल दीपक ठाकूर यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पशुसंवर्धन कायद्यान्वये गोविंद रमेश शिसोदिया (देवास), देवसिंग बाबूलाल भाटीया (रा. नागदा), इकबाल साबीर बेग (नागदा पनवाडी, तिघेही मध्य प्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार राजेंद्र राठोड करीत आहेत