Jalgaon News : महापौर निवडणुकीवेळी भाजपाचे 29 नगरसेवकांनी फुटून ठाकरे गटाला साथ दिल्याने भाजपाची सत्ता खालसा झाली होती. भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बंडखोरी करून फुटलेल्या नगरसेवकांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असा गर्भित इशारा भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलतांना दिला.
भाजपा कार्यालयात एका विषयावर आयोजित पत्रकार परिषदप्रसंगी आ. भोळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गत 2018च्या मनपा निवडणुकीत भाजपाचे 75 पैकी 57 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे महापालिकेत भाजपाने एकहाती सत्ता मिळविली होती. मात्र भाजपाला या सत्तेची फळे केवळ अडीच वर्षेच चाखता आली. अडीच वर्षानंतर झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाचे 57 पैकी 29 नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकवत ठाकरे गटाला पाठींबा दिला होता. त्यामुळे महापालिकेत भाजपाची सत्ता ठाकरे गटाने हिसकावली होती. हे बंड भाजपाच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. यंदाची महापालिकेची निवडणूक या पार्श्वभूमीवर मोठी रंजक ठरणार आहे.
‘मी’ म्हणणाऱ्यांना दूर ठेवणार
निवडणुकांबाबत आ. भोळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, गत काळात भाजपाचे जे नगरसेवक फुटले होते, त्यांना त्यांच्या कृतीचे परिणाम भोगावे लागतील. तसेच यावेळेच्या निवडणुकीत ‘मी’ म्हणणाऱ्यांना आणि महापालिकेतील नगरसेवक पदाचा स्वार्थासाठी उपभोग घेणाऱ्यांना माझा विरोध राहणार असल्याचे ते म्हणाले.
57 जागांवर आमचा दावा कायम
गत निवडणुकीत भाजपाचे 57 नगरसेवक स्वबळावर निवडून आले होते. त्यामुळे यंदाच्याही निवडणुकीत या सर्व 57 जागांवर आमचा दावा कायम राहणार असल्याचे आ. भोळे यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपा हा पाच वर्ष निवडणुकीची तयारी करीत असतो. विजय हा आमचा प्राधान्यक्रम नसून कमळ घराघरात पोहचविणे हा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी जे-जे चांगले लोक आमच्याकडे जुळतील त्यांचे आम्ही स्वागतच करू असेही आ. भोळे यांनी सांगितले. तसेच राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे मनपा निवडणुका ह्या वरीष्ठांच्या आदेशानुसार लढल्या जातील असेही ते म्हणाले.