---Advertisement---
डिजिटल व्यवहार अधिक प्रभावीपणे व्हावेत, यासाठी बँकेच्या माध्यमातून ग्राहकांसाठी साक्षरता अभियान राबविले जाणार आहे. बँकेच्या सुवर्ण महोत्सवापर्यंत पाच हजार कोटींच्या व्यवसायाचे उद्दिष्ट आणि शाखांचा विस्तार केला जाईल, अशी घोषणा जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांनी केली. तहान लोकांची ही मोठी बँक आहे. असेही ते म्हणाले.
जनता सहकारी बँकेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात रविवारी (१५ जून) रोजी सकाळी १० वाजता पार पडली. या वेळी बँकेचे संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली.
बँकेने सन २०२४-२५ या काळात तीन हजार ६०० कोटींचा एकत्रित व्यवसाय करून २३४ कोटींची भरीव वाढ केली आहे. बँकेस करपूर्व नफा २५.८८ कोटी झाला असून, निव्वळ नफा १७.०८ कोटी इतका झाला आहे. निव्वळ एनपीए शून्य टक्के राखण्यात बँकेस यश आले आहे. बँकेचे भागधारक, ४३ शाखा व ग्राहक आणि डॉ. भरतदादा अमळकर यांच्या नेतृत्वात केशवस्मृती समूहाचा मोठा परिवार आहे. या माध्यमातून आपण लाखो परिवाराच्या संपर्कात आहोत. त्यांच्या सुखदुःखात सामील होत व्यवसाय उभारण्यात सदैव सहभाग असतो. सर्व समाजाला सोबत घेत प्रगतीकडे वाटचाल करण्याची आग्रही भूमिका परिवर्तनाचे माध्यम ठरेल, असा विश्वास मदाने यांनी व्यक्त केला. सभासदांची, समाजाची आर्थिक उन्नती हा अग्रक्रम ठेवून त्याबरोबर स्वदेशी, पर्यावरण कुटुंब प्रबोधन यासाठी बँक परिवार कटिबद्ध आहे.
सामाजिक बांधिलकी जोपासताना बैंक आर्थिक प्रगतीकडेही वाटचाल करीत आहे. राज्यात सक्षम व सुरक्षित बँक म्हणून जळगाव जनता सहकारी बँकेने नावलौकिक प्राप्त केला आहे. बँकेच्या सुरुवातीस अविनाश आचार्य, संचालक मंडळ व सभासदांच्या अथक प्रयत्नांतून आज बँकेचा वटवृक्ष झाला. बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने बँक आज भक्कम, अंतर्गत व्यवस्थापन सक्षम करण्याच्या प्रयत्नातून डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून वाटचाल गतीने होण्यास मदत झाली.
डिजिटल व्यवहार अधिक प्रभावीपणे व्हावेत, यासाठी बँक साक्षरता अभियान राबवणार आहे. शाखांचा विस्तार लवकर करण्याचा प्रयत्न आहे. लहान लोकांची ही मोठी बँक आहे, अशा शब्दात बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांनी बँकेची ध्येयधोरणे आणि भविष्यातील संकल्पना सभासदांपुढे मांडल्या. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. वरुण नेवे यांनी हे गीत सादर केले. अहवाल वर्षातील दिवंगत महनीय व्यक्ती व सभासदांच्या श्रद्धांजलीची नामावली वाचन बँकेच्या संचालिका आरती हुजूरबाजार यांनी केले. त्यानंतर संचालक नितीन झंवर यांनी बँकेची वाटचाल आणि आर्थिक प्रगतीचा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन अतिशय सोप्या भाषेत करून दिले.
विषय पत्रिकेवरील विषयाचे वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती यांनी केले. सभेचे विषय संचालक हिरालाल सोनवणे, सीए सुभाष लोहार, सीए नितीन झंवर, डॉ. पराग देवरे, संजय प्रभूदेसाई, हरिश्चंद्र यादव, मधुकर पाटील, जयंतीलाल सुराणा, सपन झुनझुनवाला, विवेक पाटील यांनी सभेपुढे मांडले व त्यास उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. बँकेचे उपाध्यक्ष डॉ. अतुल सरोदे यांनी आभार मानले.
सूत्रसंचालन बँकेच्या संचालिका संध्या देशमुख यांनी केले. बँक व्यवस्थापन समिती सदस्य निखिल कुलकर्णी, अशोक मणियार तसेच केशवस्मृती सेवा संस्था मणियार तसेच समूहाचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर, बँकेचे संचालक अनिल राव, बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला, सर्जना मीडिया सोल्यूशन्स प्रा. लि.चे कार्यकारी संचालक रवींद्र लड्ढा, जवाहरभाई पटेल, राजेंद्र भारुडे यांच्यासह मोठ्या संख्येने बँकेचे सभासद तसेच बँकेच्या स्थानिक शाखेचे शाखा समन्वय समिती सदस्य, कर्मचारी प्रतिनिधी हेमंत चंदनकर व ओंकार पाटील सभेस उपस्थित होते. या वेळी सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे समाधान करण्यात आले.