मुक्ताईनगर : शेतीच्या वादातून चुलतभावानेच ३२ वर्षीय तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनील रामसिंग चव्हाण (वय ३२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे सुनील चव्हाण हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. शेती आणि मजुरीचे काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. २५ मार्च रोजी सुनील हा मित्रांसोबत जेवण करण्यासाठी जात असल्याचे सांगून गेला मात्र, तो परतलाच नाही. दरम्यान, २६ मार्च रोजी सकाळी ६ वाजता टाकळी शिवारात सुनिलचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मुक्ताईनर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा केला.
दरम्यान, शेतजमीनीच्या जुन्या वादातून चुलतभावानेच सुनील याचा खून केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मयत सुनील चव्हाण याचा भाऊ संजय चव्हाण यांनी संशयित आरोपी प्रवीण जगन चव्हाण आणि बाळू ममराज जाधव (दोन्ही रा.टाकळी ता. मुक्ताईनगर) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील एकाला अटक केल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील करीत आहे.