Nandurbar News : “आपत्ती व्यवस्थापन ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून, संपूर्ण यंत्रणेची सामूहिक जबाबदारी आहे. सर्वांनी सजग, तत्पर आणि उत्तरदायित्व स्वीकारून कार्यवाही करावी.” अशा कानपिचक्या जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना देत पावसाळा जवळ येत असताना जिल्ह्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय विभागांनी पूर्ण सतर्क रहावे, असे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात बुधवारी (७ मे) मॉन्सूनपूर्व तयारीसंबंधी जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.
या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश भामरे, साहाय्यक जिल्हाधिकारी (नंदुरबार) अंजली शर्मा, साहाय्यक जिल्हाधिकारी (शहादा), कृष्णकांत कनवारिया, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता (नंदुरबार) अंकुश पालवे, जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात उन्द्भवणान्या साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधांचा साठा आणि वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवावी. पर्जन्यमापक यंत्रणा, धरणे, तलाव, मंडळ यंत्रणा यांची तपासणी करून दुरुस्ती गरजेची असल्यास ती त्वरित पूर्ण करावी. पावसाळ्याच्या काळात जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जातील, त्या अमलात आणाव्यात. आपत्तीच्या काळात मुख्यालयात थांबून विभागीय समन्वय राखणे आवश्यक आहे. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
बैठकीत उपजिल्हाधिकारी भामरे यांनी विविध विभागांकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या तयारीचा आढावा सादर केला. विभागनिहाय सादर केलेल्या उपाययोजनांवर चर्चा झाली आणि उर्वरित प्रलंबित कामांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश
देण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य पूर, दरडी कोसळणे, घरांची पडझड, वीज गळती, अपघात, आजारपण अशा सर्व बाबी लक्षात घेऊन आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच विभागांनी स्वतःच्या यंत्रणाही सक्षम ठेवाव्यात, असेही त्यांनी नमूद केले.