जळगाव: प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू असून, जिल्हाध्यक्षपदासाठी आमदार मंगेश चव्हाण, जामनेरचे चंद्रकांत बाविस्कर, मधुकर काटे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर भाजपकडे येणाऱ्यांची रीघ वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात पक्षाने भल्याभल्यांना चित करत भरभरून यश मिळविले आहे. केंद्र तसेच राज्यातील सता हाती आल्यानंतर आता आगामी काळात महापालिका, पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन निर्णयप्रक्रियेत व आपलीही वर्णी लागावी, या उद्देशाने अनेक जण तयारीला लागले आहेत. भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष या पदांना चांगला मान दिला जातो. प्रमुख निर्णयप्रक्रियेत या मंडळींनाही स्थान दिले जात असते. याशिवाय, भाजप हा प्रमुख राजकीय पक्ष सद्यःस्थितीत जिल्ह्यात आहे. त्यामुळे प्रमुख पदासाठी दावेदार भरपूर आहेत
अशी आहे रचना
पक्षात पूर्व म्हणजे रावेर लोकसभा व पश्चिम म्हणजे जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष व महानगरासाठी महानगर जिल्हाध्यक्ष असे तीन जिल्हाप्रमुख आहेत. यांसह पाच मंडलाध्यक्ष असतील. सध्या स्थानिय समित्या व पाच मंडलाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. ३० मार्चपर्यंत मंडलाध्यक्षपदांची निवड होईल, त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या वा दुसन्या आठवड्यात जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाचा आता शेवटचा टप्या सुरू आहे. त्यानंतर या निवडप्रक्रियेला सुरुवात होईल.
ही नावे आहेत चर्चेत
सध्या पूर्व भागाचे अध्यक्ष तथा आमदार अमोल जावळे हे आहेत. तर पश्चिम भागासाठी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर हे आहेत. महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून उज्ज्वला बेडाळे या आहेत. भविष्यातील निवडणुकांची स्थिती लक्षात घेऊन आगामी काळात काही बदल होऊ शकतात. यात काही नावांची चर्चा सुरू आहे. पक्षसंघटनेत अनेक वर्षांपासून काम करणाऱ्यांना संधी मिळू शकते. त्यात पूर्वेकडे जामनेरचे चंद्रकांत बाविस्कर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांची नावे चर्चेत आहेत, तर पश्चिमेकडून आमदार मंगेश चव्हाण, मधू काटे. पी. सी. आबा पाटील यांची ची नावे चर्चेत आहेत. महानगर जिल्हाप्रमुख म्हणून उज्वला बेंडाळे यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते किंवा दीपक सूर्यवंशी यांचेही नाव पुढे येऊ शकते.
मजबूत व व्यापक संघटन
जिल्ह्यात संघटना बांधणीत भाजप निश्चितपणे उजवा आहे. अगदी तळागाळापर्यंत संघटनेची व्यापकता व बांधणी दिसून येते. परिणामी संघटनकौशत्याच्या जोरावर पक्षाला दरवेळी हमखास यश मिळत असते. लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात असाच प्रत्यय आला आहे. सामान्य कार्यकर्त्याची जनतेशी नाळ असणे, हेही गरजेचे असते. अगदी त्याच पद्धतीने पक्षबांधणी दिसून येत असून, आगामी काळात पक्षांतर्गत निवडणुकीत जुन्या व कामे केलेल्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जातीय समीकरणांचा होऊ शकतो विचार
पूर्वेकडे लेवा पाटील समाज जास्त आहे. याचा विचार करून पद दिले जाऊ शकते. पश्चिमेकडे मराठा समाज जास्त आहे. या भागात मराठा जिल्हाध्यक्ष दिला गेल्यास जळगावात काही बदल होऊ शकतात. अशी चर्चा काही कार्यकत्यांमध्ये दिसून येते. नेमकी संधी कुणाला मिळते, याबाबत मात्र उत्सुकता दिसून येत आहे
Jalgaon News: भाजप जिल्हाध्यक्षपदासाठीची पक्षांतर्गत तयारी सुरू, ‘या’ नावांची होतेय चर्चा
by team
Published On: मार्च 25, 2025 10:58 am

---Advertisement---