दंगली प्रकरण : एमआयडीसी पोलिसांनी बांधल्या दोघांच्या मुसक्या

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२२ । जळगाव शहरातील जाखनीनगर नगरात दोन कुटूंबात जुन्या वादातून झालेल्या तुंबळ हाणामारीनंतर एमआयडीसी पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी एका कुटूंबातील दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी गुरूवारी तांबापूरा परीसरातून अटक केली. त्यानंतर दोघांना न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केली.

जयेश दिलीप माचरे (२३) व कपिल दिलीप बागडे (३२) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जाखनीनगरात सावन बागडे हे नातेवाईकांसह २७ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घराबाहेर बसले असताना संशयीत जयेश माचरे, शशिकांत बागडे, कार्तिक बाटूंगे, आकाश माचरे, कपिल बागडे, अर्जुन माचरे, रोहित माचरे, दीपमाला बाटूंगे, तमन्ना माचरे, ऋतिक बागडे, राहुल माचरे, नीलेश माचरे, दीपशा भाट, रत्नाबाई बागडे यांनी सावन बागडे यांना शिविगाळ करून त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या घरातील सामानाची तोडफोड केली. नंतर चारचाकी वाहनाचे नुकसान केले होते. याबाबत सावन बागडे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील संशयीत जयेश माचरे व कपिल बागडे यांना तांबापूरा परीसरातून एमआयडीसी पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किरण पाटील, इमरान सैय्यद, किशोर पाटील, सुधीर साळवे यांनी गुरूवारी रात्री अटक केली. संशयीतांना शुक्रवारी जळगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.