BKC मध्ये ‘समष्टी श्री हनुमान चालीसा हवन’ संपन्न; चिन्मय मिशनच्या ७५ वर्षांचा भव्य अध्यात्मिक सोहळा…!

---Advertisement---

 

मुंबईच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत एक नवा सुवर्णअध्याय जोडत, चिन्मय मिशनतर्फे मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर भव्य ‘समष्टी श्री हनुमान चालीसा हवन’ मोठ्या भक्तिभावात पार पडला. चिन्मय मिशनच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सोहळ्यात १० हजारांहून अधिक भाविकांनी सामूहिक प्रार्थनेत सहभाग नोंदवला.

“Chant Mumbai, Shant Mumbai” या संकल्पनेखाली आयोजित या कार्यक्रमातून मुंबईसह संपूर्ण विश्वासाठी शांतता, शक्ती आणि समृद्धीची प्रार्थना करण्यात आली. हा कार्यक्रम देशभर सुरू असलेल्या *‘चिन्मय अमृत महोत्सवा’*चा एक महत्त्वाचा भाग होता.

या हवनाचे जागतिक समन्वयक पूज्य स्वामी स्वात्मानंद यांनी माहिती दिली की, जगभरातील चिन्मय मिशनच्या ८० केंद्रांमध्ये ‘१०८ समष्टी हनुमान चालीसा हवन’ आयोजित केले जाणार असून, मुंबईतील हा सर्वात मोठा सोहळा ठरला. या वेळी तब्बल २७६ हवन कुंड प्रज्वलित करण्यात आले आणि हनुमान चालीसेचे २१ वेळा सामूहिक पठण करण्यात आले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या संदेशात म्हटले की, चिन्मय मिशनने गेल्या सात दशकांहून अधिक काळ वेदांताचे ज्ञान, भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्ये समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवली आहेत. शिक्षण, समाजसेवा, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि राष्ट्र उभारणीत मिशनचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.

या सोहळ्याला चिन्मय मिशनचे माजी जागतिक प्रमुख पूज्य स्वामी तेजोमयानंद, विद्यमान जागतिक प्रमुख पूज्य स्वामी स्वरूपानंद, तसेच मिशनचे अनेक वरिष्ठ संन्यासी आणि अध्यात्मिक नेते उपस्थित होते. पूज्य स्वामी स्वरूपानंद यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सामूहिक हनुमान चालीसा पठण हे केवळ धार्मिक कर्मकांड नसून, ते मन, विचार आणि हृदय यांना एकत्र बांधणारी साधना आहे.

या हवनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक हवन कुंडांचे नेतृत्व महिला पुरोहितांनी केले. तसेच, २१ वर्षांखालील मुला-मुलींसाठी आणि तरुणांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला होता. मुंबई आणि परिसरातील १५० शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी शिक्षकांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या कार्यक्रमाला उद्योगजगतातील मान्यवर व्यक्ती, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, तसेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित पाहुण्यांनी उपस्थिती लावली.

या सामूहिक हवनातून चिन्मय मिशनच्या विविध सामाजिक आणि सेवा उपक्रमांना बळ मिळणार आहे. ग्रामीण विकास, वैद्यकीय सेवा, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी कार्य, तसेच कोची येथील चिन्मय विश्व विद्यापीठातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी या उपक्रमाचा उपयोग केला जाणार आहे.

‘समष्टी श्री हनुमान चालीसा हवन’द्वारे सनातन धर्माची एकत्र आणणारी शक्ती पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. वय, भाषा आणि पार्श्वभूमीच्या पलीकडे जाऊन समाजात एकात्मता, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा हा सोहळा ठरला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---