Sanjay Raut: पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त दिसतातः संजय राऊत

Jalgaon News: जळगाव: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचे दौरे सुरु आहे. अशात जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब गाटाचे नेते संजय राऊत हे रविवार ६ ऑक्टोंबर रोजी शहरात होते. दरम्यान, त्यांनी पत्रकार परिषद घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त दिसतात’ असे म्हणत टिका केली.

संजय राऊत हे पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. महाराष्ट्रात नरेंद्र मोदींनी कितीही सभा घेतल्या, कितीही फिती कापाल्या तरी उपयोग नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त दिसतात आणि हरियाणा, जम्मू काश्मीरमधील निवडणूक ते हरतात. आगमी काळात महाराष्ट्र, झारखंड राज्याच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय होणार आहे. कारण राज्यातील जनतेने ठरवलेलं आहे की, थापेबाजी बंद झाली पाहिजे, मला तर सतत भीती वाटते की निवडणूक काळात हे लोकं देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय? कारण ते दिल्लीत टिकतंच नाहीत, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.