कडू महाजन
धरणगाव : गेल्या तीन जूनपासुन मौसमी पावसाने विश्रांती घेतल्याने मान्सून चिन्हे लांबणीवर पडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. आता पेरणीसाठी पावसाची प्रतिक्षा वाढली आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात १५ जूननंतर मौसमी पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त होत असून शेती मशागतीची कामे अंतीम टप्प्यात पोहचली आहे.
यंदा संपूर्ण मे महिना अवकाळी पावसाने कहर केला. तर २३ मेच्या आसपासच मुंबईत मॉन्सूनने धडक दिली होती. जळगाव जिल्ह्यात व विविध तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यातच मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली होती. मात्र मॉन्सून मुंबईत आल्यानंतर त्याची वाटचाल मंदावली. त्यामुळेच जून महिन्यातील पहिला आठवडा गेला, तरीही मॉन्सूनची हजेरी नाही. इतकेच नाहीतर आणखी सात दिवस मॉन्सून दाखल होण्याची शक्यता नसल्यामुळे पेरणीसाठी यंदाही दरवर्षीप्रमाणेच शेतकऱ्यांना जूनचा तिसरा आठवडाच उजाडण्याची शक्यता आहे.
मॉन्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणाहून सर्वसाधारणतः कोणतेही अडथळे न आल्यास उत्तर महाराष्ट्रात सात दिवसांनी पाऊस पोहोचतो, असा हवामान तज्ज्ञांचा अनुभव आहे.मात्र यंदा २३ मेस मॉन्सून मुंबईत दाखल झाला होता. सुरूवातीला एक दिवस मॉन्सूनची घौडदौडही चांगल्या प्रकारे होती. मात्र २५ मेपासून मॉन्सून थबकला. त्यामध्ये अडथळे आले नाही. मॉन्सूनचा प्रभाव मुंबईतही कमी झाला. त्यामुळे पुढे सरकण्याची त्याची गती मंद झाली. त्यामुळेच मागील पाच ते सहा दिवसांपासून पाऊस झालेला नाही.
शुकवारी (ता. ६) ३९ अंश कमाल तापमान असले तरी हवेतील ३६ टक्के आर्द्रतेनुसार प्रत्यक्षात ४२ अंश तापमान असल्याचे जाणवून येत होते. आजही (ता. ७) तेवढेच तापमान होते. शनिवार ते सोमवार दरम्यान हवामान ढगाळ तसेच तापमान ३९ ते २९ अंशादरम्यान राहण्याची शक्यता असून, सप्ताहाच्या पूर्वार्धात तुरळक ते मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज आहे. व्यक्त करण्यात येत आहे.
८ जूनपासून तापमानवाढ
आठ ते तेरा जूनपर्यंत तापमान मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मे महिन्याची अनुभूती जूनमध्ये मिळण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ४० ते ४२ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील व सोबतच प्रचंड असह्य करणारा उकाडा देखील राहणार आहे. म्हणूनच मॉन्सून प्रतीक्षा करायला लावणार तर वातावरण परीक्षा घेणार.मॉन्सूनला गती देण्यासाठी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आवश्यक आहे. मात्र बंगालच्या उपसागरात तूर्ततरी पुरेशी नवीन कमी दाबाची प्रणाली तयार होत नसल्याने मॉन्सूनचे वारे जळगाव जिल्ह्य़ात पर्यंत पोहोचण्यास असमर्थ आहेत.
मॉन्सून थबकला
मॉन्सूनची सद्यस्थिती पाहता जिल्ह्य़ातील नांगरीकांना अजून किमान सात दिवस तरी पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या दरम्यान, मॉन्सूनला बळकटी मिळण्याची शक्यता आहे. पाऊस १४ ते १५ जूनपासून जिल्ह्यात सक्रिय होण्याची शक्यता आहे.हे विक्षोभ मॉन्सूनच्या बाष्पयुक्त वाऱ्यांना अंतर्गत भागात येण्यापासून रोखत आहेत, अशी माहिती हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दैनिक तरूण भारत चा वृत्त प्रतिनिधी बोलतांना व्यक्त केली. परंतु तालुक्यातील पुर्वत्तर भागातील ग्रामीण भागात पंधरा ते पंचवीस मे दरम्यान झालेल्या कापुस लागवडीतील आंतरगत मशागतीचे कामे सुरु असुन काही भागात ठिबक सिंचनाद्वारे कापुस लागवडीस सुरुवात करण्यात आली आहे.