स्मारक चौकातील फलकाने चर्चेला उधाण; अधिकाऱ्यांकडे वळताहेत संशयाची सुई
तळोदा : येथील पालिका प्रशासन या ना त्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. आता ‘तळोदा नगरपालिकेत पैसे खाणारे बकासुर’ या आशयाच्या शहरातील मुख्य स्मारक चौकात लावलेल्या फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, आता हा फलक चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वीही शहरातील रस्ते, गटारी, चौकांची दैना झाल्याचा छायाचित्रांसह फलकाची तब्बल महिनाभर चर्चा रंगली होती. त्यानंतर फलकाविरोधात पालिकेकडून कारवाई करीत गुन्हे दाखल केले होते.

शहरातील मुख्य स्मारक चौकात 1 जूनला रात्री 9 ते 10 दरम्यान ‘तळोदा नगरपालिकेत पैस खाणारे बकासूर’ या आशयाचा फलक मुख्याधिकारी विक्रम जगदाळे व लेखापाल कंडरे यांच्या छायाचित्रांसह झळकला आहे. शिवाय, मुख्याधिकारी व लेखापालांच्या छायाचित्रांच्या बाजूला बकासुरचे प्रतीकात्मक छायाचित्रही आहे. तसेच संविधानिक पदावर असंविधानिक पद्धतीने ‘टक्केवारी’चा नवीन विक्रम सध्या तळोदा पालिकेचे मुख्याधिकारी व लेखापालांकडून जी लूट चालवली आहे, ती आजतागायत कोणत्याही अधिकाऱ्यांनी न केलेली लूट आहे, असेही फलकात नमूद केले आहे.
फलकातून मुख्याधिकारी व लेखापालांवर टक्केवारीचा आरोप करण्यात आला असून, पालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांकडूनही निवृत्तिवेतन देण्यासाठी वसुली केली जात असल्याचा आरोप आहे. तसेच निविदाप्रक्रिया, दालनांत बसविलेली वातानुकूलित यंत्रणा, ओल्या पार्ट्या करणारे तुम्ही आणि तेदेखील काय फक्त पैशांसाठीच ना? असे विविध आरोप करीत ही काही पहिली वेळ नाही की कोणी तुमच्या या मनमानी कारभाराचा विरोधात बोलत आहे, आपण ज्या अकोला नगरपंचायतीत मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता, त्या ठिकाणीदेखील आपल्याविरोधात तेथील नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे लेखी तक्रार दिली व जिल्हाधिकाऱ्यांनी पाच अधिकाऱ्यांची समिती नेमून आपली चौकशी केली. त्यानंतर आपण त्या ठिकाणाहून बदली (पळ काढून) तळोदा पालिकेत आला व इथेही आपण तोच कित्ता गिरवत आहात, हे समजले आहे. आपण कोणा-कोणामार्फत टक्केवारी घेतात, याचेही काही व्हिडिओ व रेकॉर्डिंग आहेत. योग्य वेळी ती जनतेसमोर येईलच. जर कोणाकडून टक्केवारी घेतली नसेल, स्वच्छ असे अधिकारी असाल, तर माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आव्हानही फलकातून मुख्याधिकारी व लेखापालांना दिले आहे. फलकाच्या खाली जितेंद्र शिवकुमार दुबे (तळोदा शहरप्रमुख, शिवसेना) असे लिहिले आहे.

दरम्यान, चार-पाच महिन्यांपूर्वीही जय श्रीराम ग्रुपच्या सदस्यांनी शहरातील समस्यांचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील रस्त्यांसह गटारी, इमारती, चौक आदींच्या दैनावस्थेतील छायाचित्रे तसेच विक्रम वेताळाचे चित्र असलेला फलक याच मुख्य स्मारक चौकात लावला होता. त्या वेळी पालिका प्रशासनाने तत्काळ दखल घेत या संस्थेच्या सदस्यांवर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हे दाखल केले होते. आता मुख्याधिकारी व लेखापालांची छायाचित्र लावत फलक लावण्यात आला आहे. यावर पालिका प्रशासन काय कारवाई करते, याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे.