भीषण! पुलावरून कार कोसळून अमळनेरातील तिघांचा मृत्यू

धुळे /अमळनेर । गेल्या काही दिवसांपासून राज्यात रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात दररोज अपघाताच्या घटना घडत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. याच दरम्यान, पुलावरून कार कोसळून अमळनेर मधील दोन महिलांसह तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. तर या अपघात चार जण जखमी झाले असून जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले सरलाबाई पंडीत पाटील (वय ४५), मीनाबाई राजेंद्र पाटील (वय ५०), व शाहू विजय पाटील (वय १०, सर्व रा.अमळनेर) अशी मृतांची नावे असून या अपघातातील जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले

नाशिक येथून गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून पाटील परिवार कारने (क्र.एमएच ०४-एफझेड३६८९) अमळनेरकडे येत होता. वेगाने येणारी कार फागणे-अमळनेर रस्त्यावरील नवलनगर गावाजवळ असलेल्या एका लहान पुलावरून खाली कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला.

तर या अपघातात कारमधील चार जण जखमी झाले आहेत. कारमध्ये जवळपास सात ते आठ जण होते. दरम्यान, ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना रूग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक अनिल महाजन व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत धुळे तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.