गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विजेबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. तरीदेखील महावितरणकडून शेतकऱ्यांच्या विजेबाबतच्या समस्या सोडविल्या जात नाही. ज्या दिवशी मी बाजूला होईन, त्यादिवशी सबस्टेशनमध्ये बसणे अवघड होईल.
डीपीडीसीच्या निधीतून एवढा निधी मंजूर करूनदेखील या समस्या सोडवल्या जात नसतील तर महावितरणचे अधिकारी कर्मचारी नेमकं करताय काय? असा संतप्त सवाल करत पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
दरम्यान, शेतकरी कशा परिस्थितीत शेती करतो याची जाणीव ठेवून एक महिन्याच्या आत विजेच्या समस्यांसह शेतातील ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न सोडवावा, असे आदेशही आमदार किशोर पाटील यांनी दिले आहेत. येथील प्रांताधिकारी कार्यालयात पार पडलेल्या वीज वितरण अधिकाऱ्यांसोबतच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
या वेळी प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भुराप्पा पाटील, शहरप्रमुख सुमित सावंत, स्वीय सहायक राजेश पाटील, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर आमदार किशोर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या महावितरणसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरणकडून टाळाटाळ केली जात असत्याच्या तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार, प्रांताधिकारी कार्यालयत तातडीची बैठक बोलवून महावितरणसंदर्भातील तक्रारींचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांकडून कापूस, मका, ज्वारी पिकांची लागवड करण्यात आली आहे, असे असताना विजेच्या समस्येमुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. म्हणून याबाबतचे प्रश्न बैठकीत उपस्थित करत आढावा घेण्यात आला.
अधिकारी-कर्मचाऱ्यांना इशारा
या बैठकीत महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून विजेच्या समस्येबाबत माहिती घेऊन ते प्रश्न सोडवण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. महावितरणच्या प्रश्नांसंदर्भात लाईनमनपासून ते कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक आयोजित करण्यात येईल. तसेच जे अधिकारी-कर्मचारी या बैठकीस गैरहजर राहतील त्यांच्यावर वरिष्ठ स्तरावर माझ्या पद्धतीने तक्रार करेल, अशा इशाराही आमदार पाटील यांनी या वेळी दिला आहे.