---Advertisement---
जळगाव : शहरातील लांडोरखोरी येथील सार्वजनिक उद्यानास ‘अरण्यऋषी’ पद्मश्री मा. मारुती चितमपल्ली यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मनसेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर व शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन याबाबतचे निवेदन सादर केले.
पद्मश्री मा. मारुती चितमपल्ली हे प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ, पक्षी व वन्यजीव अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक होते. त्यांनी आपल्या लेखनातून आणि कार्यातून पर्यावरणप्रेमींच्या अनेक पिढ्यांना जागृत आणि प्रेरित केले. ‘अरण्यऋषी’ ही उपाधी प्राप्त असलेले चितमपल्ली यांनी निसर्गसंवर्धनासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते.
---Advertisement---
वर्ष २००९ मध्ये जळगाव येथे पार पडलेल्या ‘वसुंधरा महोत्सवा’त त्यांनी उपस्थित राहून जळगावकरांना आपल्या विचारांनी समृद्ध केले होते. त्यामुळे त्यांचे जळगाव शहराशी असलेले भावनिक नाते अधोरेखित होते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
या मागणीमागे पर्यावरण जपण्याची जाणीव निर्माण करणे, नव्या पिढीला प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणे आणि मा. चितमपल्ली यांच्या कार्याचा गौरव करणे, असे उद्दिष्ट आहे. लांडोरखोरीसारख्या नैसर्गिक परिसरात त्यांच्या नावाचे स्मारक स्वरूपात नाव देणे, हीच खरी मानवंदना ठरेल, असे मनसेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
याप्रसंगी उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे,, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, प्रसिद्धी प्रमुख सतीश सैदाने, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, सचिव जितेंद्र पाटील, दीपक राठोड, संजय मोती, विकास पाथरे उपस्थित होते.