---Advertisement---
Jalgaon Monsoon Update : जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरीस मान्सूनचे आगमन झाले असून, हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. २४ जूननंतर सुरू झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, हवामान खात्याने येत्या काही दिवसांत आणखीन पावसाची शक्यता वर्तविली असून, त्यामुळे मका, कापूस, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग यासारख्या प्रमुख पिकांना बळ मिळणार आहे.
गुरुवारी सकाळपासूनच आकाश ढगाळ होते. काही वेळातच रिपरिप पावसाला सुरुवात झाली आणि दुपारनंतर काही भागांमध्ये मोठ्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना रेनकोट, छत्र्यांचा आधार घ्यावा लागला. दिवसभर पावसाच्या सरी अधूनमधून सुरूच राहिल्या. या पावसामुळे आधीच पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मातीतील ओलावा टिकून राहिल्यामुळे सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आदी पिकांच्या उगमावर सकारात्मक परिणाम होणार आहे. दुसरीकडे, अद्याप पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही संधी लाभदायक ठरणार आहे. जमिनीत पुरेसा ओलावा तयार झाला आहे.
जिल्ह्यातील काही भागात या पावसामुळे पाणी साचले असून, जमिनीची मशागत करण्यायोग्य स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, अद्याप नदी-नाले कोरडे आहेत आणि जलस्तर वाढण्यासाठी मुसळधार पावसाची गरज आहे. धरणे, बंधारे यामध्ये साठा होण्यासाठी अजून काही दिवस सातत्याने पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आणखीन पावसाची शक्यता
दरम्यान, हवामान खात्याने येत्या काही दिवसांत आणखीन पावसाची शक्यता वर्तविली असून, त्यामुळे मका, कापूस, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग यासारख्या प्रमुख पिकांना बळ मिळणार आहे. शेतकरी वर्ग सध्या हवामानाच्या अनुकूलतेकडे आशेने पाहत असून, योग्य पावसामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.