---Advertisement---
जळगाव : प्रवासी रिक्षा आणि सिमेंट मिक्सर वाहनात झालेल्या अपघातात आई आणि महिन्यावर लग्न असलेली लेक यांच्यासह ३ जण ठार, तर पाचजण जखमी झाले. ही घटना जामनेर तालुक्यातील गंगापुरी ते गारखेडेदरम्यान घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये सरला गोपाळ निंबाळकर (४२) आणि त्यांची मुलगी निकिता गोपाळ निंबाळकर (२०, दोन्ही रा. चिंचखेडे बुद्रुक, ता. जामनेर) आणि प्रमोद श्रीराम गुरुभैया (३२, रा. तळेगाव, ता. जामनेर) यांचा समावेश आहे.
जखमींमध्ये जयेश निंबाळकर (वय १६), योगेश गायकवाड (४५, रिक्षाचालक, रा. विवेकानंद नगर, जामनेर), सुरेखा विलास कापडे (५०) संगीता सुभाष चौधरी (५०, दोन्ही रा. छत्रपती संभाजीनगर), अखिलेश कुमार (५०, रा. उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. धडक बसताच रिक्षा पूर्णपणे गोल फिरून रस्त्याच्या बाजूला उलटली.
पुढील महिन्यात होणार होते लग्न
निकिता निंबाळकर हिचे येत्या २३ जानेवारी रोजी लग्न ठरले होते. मात्र, सुखी संसाराचे स्वप्न पाहत असतानाच अपघातात तिचा मृत्यू झाला.
उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर डॉ. प्रशांत महाजन, डॉ. हर्षल चांदा, डॉ. नरेश पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना जळगावला हलविण्यात आले. चिंचखेडे बुद्रुक व तळेगाव येथील मयतांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली.









