---Advertisement---
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळची 10वी परीक्षा आजपासून राज्यभरात सुरू झाली असून ही परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान पार पडणार आहे. यंदा राज्यभरातून तब्बल १६,१५,४८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केली असून कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. काही संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्ही व अन्य निरीक्षण प्रणालीद्वारे देखरेख ठेवली जात आहे. कॉपी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही मंडळाने दिला आहे.
दरम्यान, Central Board of Secondary Education (CBSE) ने दहावीच्या परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. CBSE बोर्डाने दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासोबत काही कडक अटीही लागू करण्यात आल्या आहेत.
काय आहेत नवीन नियम?
पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही.
किमान तीन विषयांची परीक्षा न दिल्यास विद्यार्थ्यांना ‘Essential Repeat’ श्रेणीत ठेवले जाईल.
अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागेल.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त तीन विषयांमध्ये गुण सुधारण्याची संधी मिळेल.
कोणत्याही प्रकारची विशेष सवलत किंवा सूट दिली जाणार नाही.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसमोर परीक्षेला हजर राहणे अनिवार्य ठरले आहे. सुट्टी, पळवाट किंवा पर्यायी संधी याबाबत कोणतीही अतिरिक्त सवलत नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थी आणि पालकांनी नियमांची सविस्तर माहिती घेऊन परीक्षेची योग्य तयारी करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.









