---Advertisement---
महाराष्ट्र स्वतंत्र देश असता तर जगातील तिसाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली असती, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा वेगाने होत असलेला विस्तार अधोरेखित करताना त्यांनी महाराष्ट्राने व्हिएतनाम-थायलंडसारख्या अनेक देशांना मागे टाकल्याचे विधान केले.
अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सदर विधान केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचा सकल राज्य उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढला असून, जगातील पहिल्या ३५ देशांचा विचार केला तर महाराष्ट्राने ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपिन्स, व्हिएतनाम, बांगलादेश या देशांना मागे टाकले आहे.
पुढील दोन ते तीन वर्षांत सध्याचा विकासदर कायम राहिला तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था संयुक्त अरब अमिरात आणि सिंगापूर यांनाही मागे टाकू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
२०१३-१४ या वर्षी महाराष्ट्राचा जीएसडीपी सुमारे १६ लाख कोटी रुपये होता. मात्र गेल्या दहा वर्षांत राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार मोठ्या प्रमाणात – झाला असून तो सुमारे ५१ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच एका दशकात राज्याच्या अर्थव्यवस्थेत तीनपट वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्याचा आर्थिक विकासदरही देशाच्या सरासरीपेक्षा अधिक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. स्थिर किमतीनुसार महाराष्ट्राचा विकासदर ७.९ टक्के असून चालू किमतीनुसार तो १०.४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तसेच राज्याचे दरडोई उत्पन्नही वाढले असून ते सुमारे ३ लाख ६७ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे.









