उन्हाळ्यात कुलरचा वापर वाढला; पण सुरक्षितता विसरू नका! महावितरणचे नागरिकांना सजगतेचे आवाहन

---Advertisement---

 

जळगाव : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने घराघरांत कुलरचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. मात्र, योग्य खबरदारी न घेतल्यास कुलरमुळे विद्युत अपघात होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी कुलर वापरताना आवश्यक विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

कुलर वापरताना नेहमी थ्री-पिन प्लगचा वापर करणे अत्यावश्यक आहे. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा पूर्णपणे बंद करून प्लग काढणे गरजेचे आहे. तसेच पाणी भरताना ते बाहेर सांडणार नाही याची काळजी घ्यावी, कारण ओलसर जमीन आणि वीज यांचा संपर्क धोकादायक ठरू शकतो.

कुलर चालू असताना त्याच्या कोणत्याही भागाला स्पर्श करू नये आणि ओल्या हाताने कुलर हाताळणे टाळावे. कुलरचे वायरिंग आणि कनेक्शन अधिकृत तज्ञांकडून तपासून घेणे तसेच योग्य अर्थिंग केल्याची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य अर्थिंगमुळे लिकेज करंटपासून संरक्षण मिळते.

लहान मुलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे. मुलांना कुलरपासून दूर ठेवणे आणि त्यांना कुलरजवळ खेळू न देणे आवश्यक आहे. याशिवाय, खराब किंवा जीर्ण वायर त्वरित बदलणे, कुलर हलवताना प्लग काढणे, तसेच दुरुस्ती करताना वीजपुरवठा बंद ठेवणे यांसारख्या साध्या पण महत्त्वाच्या गोष्टींची अंमलबजावणी करावी. घरामध्ये अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवणेही सुरक्षिततेसाठी फायदेशीर ठरते. पाण्याचा पंप ठराविक वेळ चालू-बंद ठेवणारे सर्किट वापरल्यास वीज बचत होऊ शकते.

थोडीशी दक्षता आणि योग्य उपाययोजना केल्यास कुलरचा वापर सुरक्षित आणि अपघातमुक्त होऊ शकतो, असे सांगत महावितरणने नागरिकांना या नियमांचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---