---Advertisement---
जळगाव: जळगाव शहरात सूर्याचा पारा ४२-४५ अंशांच्या पार गेला असून, उन्हाच्या या भीषण तीव्रतेचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील प्रमुख वाहतूक सिग्नल सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात यावेत, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने करण्यात आली आहे. या मागणीला वाहतूक पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच यावर अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांनी वाहतूक विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुपारी सिग्नलवर थांबल्यामुळे दुचाकी चालकांना थेट उन्हाचा तडाखा सहन करावा लागतो. यामुळे वाहनधारकांना चक्कर येणे, डिहायड्रेशन आणि अशक्तपणा जाणवण्यासारख्या समस्या उद्भवत आहेत. उन्हात ताटकळत उभे राहिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
शहरातील मुख्य चौकांमधील सिग्नल सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवावेत.
सिग्नल बंद असल्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करावेत.
वाहनचालकांना उन्हापासून दिलासा देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी.
मनसेच्या या निवेदनाची दखल घेत वाहतूक पोलीस निरीक्षकांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. शहराच्या वाढत्या तापमानाचा विचार करता आणि नागरिकांच्या सोयीसाठी याबाबत योग्य तो तांत्रिक अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
”नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. उन्हामुळे दुचाकी चालकांचे हाल होत आहेत, त्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.”
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, आशुतोष जाधव, चेतन पवार, संदीप मांडोळे, खुशाल ठाकूर, राहुल चव्हाण, प्रदीप पाटील, जितेंद्र पाटील, साजन पाटील, युसुफ खाटीक, बादशाह शहा, राजेश मराठे यांच्यासह मोठ्या संख्येने मनसे सैनिक उपस्थित होते.









