---Advertisement---
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. याला कारण ठरले ते जय पवार यांनी केलेले सूचक वक्तव्य.
बारामतीतील निकालानंतर माध्यमांशी संवाद साधताना जय पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या आगामी वाटचालीवर भाष्य केले. निवडणुकीत सर्वांनी एकत्र येत काम केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, दिवंगत नेते अजित पवार यांच्या कार्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणाबाबत विचारण्यात आले असता, “या विषयावर निर्णय घेणे हे माझ्या एकट्याच्या हातात नाही. दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय घेतील, तेव्हा पुढील चित्र स्पष्ट होईल,” असे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनीही विलिनीकरणाबाबत प्रतिक्रिया देत सध्या कोणतीही ठोस चर्चा सुरू नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे जय पवार यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
बारामतीतील निकालामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









