---Advertisement---
जळगाव शहरातील वाढत्या उष्णतेवर उपाय म्हणून ‘कूल रूफ सोल्युशन’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते समतानगर येथे या प्रकल्पाची सुरुवात झाली.
“महाराष्ट्रातील उष्णता व पाणी ताण कमी करण्यासाठी निसर्ग आधारित उपाय” या प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. All India Disaster Mitigation Institute, Practical Action, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था आणि जळगाव महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
या अंतर्गत पत्र्याच्या घरांवर सोलर रिफ्लेक्टिव्ह पेंटचा डबल कोट दिला जात आहे. या विशेष रंगामुळे सूर्यकिरणांचे परावर्तन होऊन घरातील तापमानात तब्बल १० अंश सेल्सिअसपर्यंत घट होत असल्याचे प्रत्यक्ष पाहण्यात आले. कार्यक्रमादरम्यान रंग केलेल्या आणि न केलेल्या घरांमधील तापमान मोजण्यात आले असता लक्षणीय फरक दिसून आला.
या उपक्रमांतर्गत शहरातील सुमारे ४०० घरांवर सोलर रिफ्लेक्टिव्ह पेंट लावण्यात येणार आहे. समतानगर, तांबापुरा, सुप्रीम कॉलनी आणि पिंप्राळा हुडको या भागांतील घरांचा यात समावेश आहे.
या प्रकल्पामुळे नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळणार असून, भविष्यात शहरातील इतर भागांमध्येही या उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार आहे.









