---Advertisement---
देशासह राज्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेल उद्योगावर वाढत्या खर्चाचा ताण वाढत चालला असून, त्याचा थेट परिणाम खवय्यांच्या खिशावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वडापाव, स्नॅक्स आणि थाळीपासून ते रेस्टॉरंटमधील सर्वच पदार्थ 20% पर्यंत महाग होण्याचे संकेत मिळत आहेत.
हॉटेल उद्योगातील प्रमुख व्यक्तिमत्व विजय शेट्टी यांनी या परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती, इंधन दरवाढ आणि प्रशासकीय अडचणींमुळे हॉटेल व्यवसायिकांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. अनेक रेस्टॉरंट्सने खर्च कमी करण्यासाठी पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) वापरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अर्ज आणि डिपॉझिट भरूनही अनेक ठिकाणी अजूनही गॅस कनेक्शन मिळालेले नाही. त्यामुळे हॉटेल्सना महागड्या कमर्शियल गॅस सिलेंडरवर अवलंबून राहावे लागत आहे.
कमर्शियल गॅसवर वाढलेले कर, खाद्यतेल, डाळी, भाजीपाला यांसारख्या कच्च्या मालाच्या किंमतीतील वाढ, तसेच वीज दरवाढ यामुळे हॉटेल्सचा ऑपरेशनल खर्च तब्बल 25 टक्क्यांनी वाढला आहे. याशिवाय कामगारांची कमतरता आणि परवान्यांच्या शुल्कात वाढ या समस्याही समोर आहेत.
या पार्श्वभूमीवर, सरकारने तातडीने सवलती जाहीर केल्या नाहीत तर हॉटेल मालकांना मेन्यू कार्डवरील दर वाढवण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. उद्योगातील अंदाजानुसार, येत्या काळात खाद्यपदार्थांच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
याचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय कुटुंबांना बसण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी बाहेर जेवणाचा प्लॅन करणाऱ्या खवय्यांचे बजेट कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत.









