Protest in Bengal against Waqf Act: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रघुनाथगंज पोलीस स्टेशन परिसरात वक्फ सुधारणा कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मोर्चाला अचानक हिंसक वळण लागले आहे. या मोर्चात पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांनी रस्ता अडवला आणि पोलिसांच्या गाड्यांना आग लावली. सुरुवातीला पोलिसांनी आंदोलकांना एकाच ठिकाणी निषेध करण्यास सांगितले, परंतु अचानक आंदोलक सांगितलेल्या जागेच्या पलीकडे जाऊ लागले.
यादरम्यान पोलिसांशी झटापट झाली. निदर्शकांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी सौम्य बळाचा वापरही केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. या हिंसाचारात अनेक पोलिस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
वक्फ कायद्याविरुद्धचा हा मोर्चा आधीच नियोजित होता. अचानक शांततेत सुरू असलेल्या मोर्चाचे हिंसाचारात रूपांतर झाले. निदर्शकांची पोलिसांशीही झटापट झाली. या घटनेबाबत भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, “पश्चिम बंगाल पुन्हा एकदा आगीत पेटले आहे. मुर्शिदाबादच्या रस्त्यांवर दंगल घडवून आणणाऱ्या हिंसक इस्लामिक जमावाला नियंत्रित करण्यासाठी पश्चिम बंगाल पोलिस संघर्ष करत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे या अशांततेला चालना मिळाली आहे.”