Curfew in Jalgaon district: आगामी महानगरपालिका निवडणुकां व विविध सण, जयंती, धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून या कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येण्याचा अंदाज आहे. जिल्यातील जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, जमावबंदीचे आदेश लागू केला आहे. जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व (३) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.
अलीकडे जिल्ह्यात घडलेल्या काही घटनांमुळे जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार ३ मे २०२५ रोजी पहाटे ००.०१ वाजल्यापासून ते १६ मे २०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे, सभा घेणे, मिरवणूक काढणे, शस्त्र किंवा स्फोटक द्रव्ये बाळगणे, चित्रांचे दहन, अशांतता पसरविणारे वर्तन किंवा साहित्य तयार करणे, तसेच शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृतीवर बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान,८ मे ते १६ मे या कालावधीत विविध सण, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांदरम्यान मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येण्याची शक्यता असल्याने हा आदेश लागू करण्यात आला आहे.या आदेशांतर्गत वयोवृद्ध, अपंग व वैद्यकीय कारणास्तव लाठी किंवा तत्सम सहाय्यक साधनांचा वापर करणाऱ्या नागरिकांना सूट देण्यात आली आहे. तसेच शासकीय कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा व विवाह मिरवणुकांवर हा आदेश लागू होणार नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधीक्षकांची पूर्वपरवानगी आवश्यक राहील.