Maharashtra Weather Update: यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली. हा अवकाळी पाऊस असला तरी राज्यात मान्सूनचे लवकर आगमन होईल असे वाटत होते. मात्र, मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली असून मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. बदललेल्या वातावरणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनची वाट पाहावी लागणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचे काही दिवस राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान राहील. ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल. यात खानदेशात कमाल तापमान 35 ते 40 अंशापर्यंत राहील.तर विदर्भात 40 अंशापर्यंत आणि मराठवाड्यात कमाल तापमान 35 ते 40 अंशापर्यंत राहील. या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर होऊ शकतो. त्यामुळे पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
4 जूनपर्यंत या भागात पावसाचा अंदाज?
भारतीय हवानाम विभागाच्या अंदाजानुसार, 1 ते 4 जूनपर्यंत पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानुसार आज म्हणजे 1 जून रोजी मुंबईसह ठाण्यात पावसाची शक्यता आहे, तर पालघरमध्ये हलक्या सरीची शक्यता आहे. यासह 2 ते 4 जून दरम्यान या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. यासह पुढचे 48 तास रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.