---Advertisement---

Street Dogs News : जळगाव शहरात 50 हजार भटके कुत्रे, वर्षभरात चार हजार जणांना चावा

by team

---Advertisement---

Street Dogs News: जळगाव शहरात तब्बल 50 हजार भटके कुत्रे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी केवळ 27 हजार 64 कुत्र्यांचे आत्तापर्यंत निर्बिजीकरण करण्यात आले असल्याची माहिती मनपातील आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान निविदेतील अटी शर्तींमुळे निर्बिजीकरणाची प्रक्रिया अडकली असल्याने भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

शहरातील नागेश्वर कॉलनी भागातील चार वर्षीय अरविंद गायकवाड या चिमुकल्याचा पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करीत जीव घेतला. या घटनेनंतर शहरवासियांमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शहरातील प्रत्येक भागात भटके आणि पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे नागरिक दहशतीत वावरत आहेत. रात्री-बेरात्री कामावरून घरी परतणाऱ्यांना तर जीव मुठीतच घेऊन वाहने चालवावी लागत आहे.

घटनेनंतर मनपाचा आरोग्य विभाग ढिम्मच

भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांसंदर्भात मनपाच्या आरोग्य विभागाकडून अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. आरोग्य विभागाच्या या ढिम्म कारभारामुळेच निष्पाप चिमुकल्याचा बळी गेल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

वर्षभरापासून निर्बिजीकरणाचा ठेका रखडला

सन 2021 मध्ये नंदुरबारच्या नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्थेला महापालिकेने श्वान निर्बिजीकरणाचा ठेका दिला होता. या संस्थेने 11690 कुत्री आणि 15274 कुत्रे असे एकुण 27064 कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले होते. या व्यतीरिक्त किमान 23 ते 25 हजार भटके कुत्रे असल्याची माहिती मिळाली आहे. नवसमाज संस्थेच्या ठेक्याची मुदत संपून एक वर्ष उलटले तरी अद्यापही कुठल्याही संस्थेला श्वान निर्बिजीकरणाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. निविदा प्रक्रियेतील अटी-शर्तींमुळे निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.

पशुवैद्यकीय विभागाला मनपा पत्र देणार

चिमुकल्याच्या मृत्यूने महापालिका प्रशासन चांगलेच हादरले आहे. सोमवारी तातडीने चौथ्यांदा निर्बिजीकरणाची निविदा प्रसिध्दीची प्रक्रिया राबविण्यात आली. तसेच श्वान निर्बिजीकरणाच्या प्रक्रियेसाठी महापालिका प्रशासन जिल्हा परीषदेच्या पशु वैद्यकीय विभागालाही पत्र देणार आहे. दरम्यान जळगावातील चिमुकल्याच्या मृत्यूबाबतची माहिती राज्याच्या नगरविकास विभागालाही कळविण्यात येणार आहे.

वर्षभरात 4189 व्यक्तींना कुत्र्याने घेतला चावा

जळगाव शहरात एप्रिल 2024 ते मे 2025 या कालावधीत 4189 जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यात 2640 पुरूष, 749 महिला आणि वय वर्षे 1 ते 12 मुले 530 आणि 270 मुलींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात घटना घडूनही महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र यासंदर्भात फारसा गंभीर दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आज आंदोलन

शहरातील भटक्या कुत्र्यांसंदर्भात शिवसेना ठाकरे गटातर्फे मंगळवारी दुपारी 12 वाजता महापालिकेवर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना ठाकरे गटातर्फे करण्यात आले आहे.

चिमुकल्या अरविंदवर अत्यंसंस्कार

नागेश्वर कॉलनीतील चार वर्षाचा चिमुकला अरविंद गायकवाड याचे पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडल्याने त्याच्या मानेला गंभीर जखमा झाल्या होत्या. जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान त्याचा करूण अंत झाला. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान आज दुपारी चिमुकल्या अरविंदवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सारेच निशब्द असेच वातावरण झाले होते.

मनपा आयुक्तांसह आरोग्य अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा

चिमुकल्याच्या मृत्यूला महानगरपालिका प्रशासन जबाबदार असून वारंवार येथील नागरीकांनी तक्रारी करून देखील मनपाने साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे मनपाचे आयुक्त व आरोग्य अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपाइं (आ) पक्षातर्फे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी रामानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच मयत चिमुकल्याच्या कुटुंबियांना 25 लाखांची आर्थिक मदत महापालिकेने द्यावी असेही निवेदनात म्हटले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment