जळगाव : शुल्क वाढ, परीक्षा विषयक विविध समस्या आदी प्रश्न सोडविण्यात यावेत या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भोंगा बजाव आंदोलन सोमवारी (२३ जून) रोजी करण्यात आले. हे आंदोलन महानगर मंत्री सागर बारी, प्रदेश मंत्री वैभवी ढिवरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या मागण्या लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांचे निकाल सध्या लागत आहेत. तसेच बीबीए, बीसीए, एमसीए, एमबीए आदी अभ्यासक्रमांचे शुल्क वाढले आहे. याबाबत निवेदन देऊन देखील विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. बीबीए, बीसीए, एमसीए, एमबीए आदी अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष 2024-25 चे शुल्क विद्यापीठ प्रशासनाने कुठली ही पूर्वसूचना न करता शैक्षणिक वर्ष संपत असताना अचानक वाढवले आहे.

हे शैक्षणिक शुल्क शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस ठरल्याप्रमाणेच आकारावे. तसेच शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीचे ही शैक्षणिक शुल्क हे नियमानुसार ठरल्याप्रमाणे 10% शिवाय अतिरिक्त वाढवू नये. विद्यापीठ परिक्षेत्रातील अनेक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे निकाल लागत असताना त्यांना परीक्षेस उपस्थित असूनही अनुपस्थित दाखवले आहे. असे चुकीचे निकाल लागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
हे लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने त्वरित ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या तक्रारी मागवून घेऊन त्यावर तक्रार मिळाल्यानंतर दोन दिवसाच्या आत सुधारित निकाल लावावा, तसेच अनुपस्थित निकाल लावण्यास जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती त्वरित कारवाई करावी. फोटोकॉपीची मागणी केल्यानंतर विशिष्ट कालमर्यादेतच फोटोकॉपी देण्याची व्यवस्था करावी तसेच पुनर्मूल्यांकनाची मागणी केल्यानंतर विशिष्ट काल मर्यादेतच पुनर्मूल्यांकनाचा निकाल लावावा. तसेच फोटोकॉपी आणि पुनर्मुल्यांकनाचे सर्व अभ्यासक्रमांचे शुल्क हे सारखे करण्यात यावे. तसेच हे शुल्क अवाढव्य आहे, त्यामुळे फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकनाचे शुल्क हे कमी करण्यात यावे.
विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे पेपर हे योग्य पद्धतीने न तपासल्यामुळे व्यवस्थित पेपर लिहून ही अनेक विद्यार्थ्यांना नापास करण्यात आलेले आहे. याच प्रकारच्या तक्रारी मागील वर्षीही आढळल्या होत्या, या विषयात आपणास यापूर्वीही विद्यार्थी परिषदेने सुचित केले होते.
परंतु, त्यावर कुठल्याही प्रकारची उपाययोजना विद्यापीठ प्रशासनाने केलेली नाही. विद्यार्थी परिषद या विषयात आपल्याकडे मागणी करते की, पेपर चेकिंग मध्ये होणाऱ्या या गोंधळावरती त्वरित उपाययोजना करत प्रत्येक विषयाच्या तज्ञ व्यक्तींकडूनच पेपर तपासले जातील याची खात्री वेळोवेळी करावी. तसेच मूल्यांकन हे व्यवस्थित होईल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
विद्यापीठाने विविध तक्रारी निवारण करण्यासाठी हेल्पलाइन नंबर दिलेले आहेत. परंतु अनेकदा हेल्पलाइन नंबर चालू असत नाही. तसेच वेळोवेळी तक्रार करून ही कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. अशा विविध विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. या विषयात विद्यापीठ प्रशासनाने हेल्पलाइन व्यवस्थित चालतील याच्यासाठी आवश्यक तितके कर्मचारी हेल्पलाईन साठी द्यावेत. तसेच मिळालेल्या तक्रारी या वेळेत निवारण केल्या जातील यासाठी ही उपाययोजना कराव्यात.