---Advertisement---
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातामागे केवळ तांत्रिक बिघाड आहे की काही घातपात, याबाबत संशय अधिक गडद होत चालला आहे. विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे.
राज्य सरकारने नेमलेल्या CID पथकाने गुरुवारी अजित पवारांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची मंत्रालयात तब्बल चार तास कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान CID चा संपूर्ण रोख हा अपघाताच्या आदल्या रात्रीच्या घटनांवर होता. २७ जानेवारी रोजी अजित पवारांची कुणाशी चर्चा झाली होती? त्या रात्री त्यांच्या हालचाली काय होत्या? याबाबत सविस्तर प्रश्न विचारण्यात आले. तसेच २८ जानेवारीच्या बारामती दौऱ्याचे नियोजन नक्की कुणी केले? शेवटच्या क्षणी दौऱ्यात काही बदल झाले होते का? प्रवासाचा मार्ग आणि वेळ कुणाच्या सांगण्यावरून निश्चित करण्यात आली होती? याच विमानाची निवड का करण्यात आली,
याआधी विमानाची तांत्रिक तपासणी झाली होती का, याचाही तपास सुरू आहे:
CID कडून आता खासगी सचिवांकडून मिळालेली माहिती आणि विमानाच्या ‘ब्लॅक बॉक्स’मधील डेटा यांची पडताळणी केली जाणार आहे. विमान जमिनीवर आदळण्यापूर्वीचा मार्ग, वेग आणि त्यानंतर झालेल्या पाच स्फोटांमधील संभाव्य विसंगती शोधण्याचं मोठं आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे.
दरम्यान, या अपघातावर आमदार अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अनेक नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे अपघात तांत्रिक होता की घातपात, या दिशेने तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. सुरुवातीला अजित पवारांचे निकटवर्तीय नेते आणि पदाधिकाऱ्यांची चौकशी केली जात आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास तीन टप्प्यांत:
पहिल्या टप्प्यात विमानाचा वेग, उंची, इंजिनचे तापमान आणि पायलटमधील संभाषणाचा तांत्रिक अभ्यास केला जाणार आहे. यासाठी ब्लॅक बॉक्समधील डेटा महत्त्वाचा ठरणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून स्फोट आणि आगीचं नेमकं कारण शोधलं जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मानवी चूक, तांत्रिक बिघाड किंवा बाह्य हस्तक्षेप म्हणजेच घातपात झाला का, यावर अंतिम निष्कर्षासह अहवाल तयार केला जाणार आहे. या तपासातून अजित पवारांच्या विमान अपघातामागचं खरं सत्य काय आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.









