चाळीसगाव : कौटुंबिक वादातून पती किंवा पत्नीने टोकाचे पाऊल उकळल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. कौटुंबिक वादातून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच नशिराबाद येथे घडली आहे. ही घटना ताजी असतांना चाळीसगावातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी २ जून रोजी पत्नीचा गळा आवळून खून करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे चाळीसगाव हादरले आहे.
कुटुंबिक वादातून पती-पत्नीमध्ये तणाव निर्माण होऊन आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे ३१ मे रोजी अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती. बारा वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या पती-पत्नीत वाद झाला होता. हा वाद विकोपाला जात पत्नीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतांना चाळीसगाव तालुक्यातील हातगावात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेत पती विजय सुखदेव चव्हाणके याने कौटूंबिक वादातून आपल्याच शेतात पत्नी वर्षा विजय चव्हाणके हिचा गळा आवळून खून केला. यानंतर विजय याने स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. या दुहेरी मृत्यूमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात प्रचंड खडबड उडाली आहे.