---Advertisement---
शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर आळा घालण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने कडक पावले उचलली असून, कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबा दरम्यानच्या अतिक्रमणांवर येत्या ४८ ते ७२ तासांत बुलडोझर चालवण्यात येणार आहे. संबंधितांना दिलेल्या नोटिसीची मुदत संपल्याने प्रशासन आता थेट कारवाईच्या तयारीत आहे.
बुधवारी (८ एप्रिल) महापौर दीपमाला काळे यांनी अजिंठा चौक परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपायुक्त पंकज गोसावी, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पाहणीदरम्यान महापौरांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.
अजिंठा चौक ते कुसुंबा हा महत्त्वाचा मार्ग असून, येथे मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. यापूर्वीच प्रशासनाने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, मुदत संपल्यानंतरही अतिक्रमणे कायम असल्याने आता थेट कारवाई अपरिहार्य ठरली आहे.
तसेच, अजिंठा चौक ते कालिका माता मंदिर या दरम्यान नव्याने उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणारी कोणतीही अतिक्रमणे सहन केली जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका महापौरांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या या धडक मोहिमेमुळे परिसरातील अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाची यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.









