जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणारी घोषणा रविवारी नागपूरच्या हैदराबाद हाऊस येथे पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळा कुममळा २०२७ पूर्वतयारीच्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्याला समृद्धी महामार्गाशी थेट जोडणाऱ्या स्वतंत्र रस्त्याची स्पष्ट मागणी मांडली, ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. या निर्णयामुळे जळगाव-नाशिक अंतर तब्बल दोन तासांनी कमी होणार आहे.
या उच्चस्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, तर प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते विकास, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरी पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली घोटी, त्र्यंबक, जव्हार राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणास मान्यता नाशिकपेठ, वणी, पिंपळगाव, नाशिक, सिन्नर रस्त्यांचे विस्तारीकरण सिन्नर, नांदूर शिंगोटे, कोल्हार मार्गाचा समावेश विस्तारीकरणात करण्यावर चर्चा झाली.
नाशकातील वाहतूक सुधारणेबाबत महाजन यांची ठोस मांडणी
नाशिक शहरातील वाहतूक कोंडी, अडथळे आणि अकार्यक्षम व्यवस्थापनाबाबत मंत्री गिरीश म हाजन यांनी ठोसपणे मुद्दे उपस्थित केले. त्यांनी द्वारका सर्कल, इंदिरानगर बोगदा, ओझरजवळील दहावा मैल यासारख्या वाहतुकीच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही द्वारका सर्कल समस्येसाठी तात्काळ पर्याय सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यांची होती उपस्थिती
बैठकीला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयुक्त मनीषा खत्री, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- “जळगाव जिल्ह्याचा समृद्धी महामार्गाशी थेट संपर्क हा फक्त प्रादेशिक विकास नव्हे, तर औद्योगिक, धार्मिक आणि पर्यटकांच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे.”
– गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री
जळगावसह उत्तर महाराष्ट्राला मोठा दिलासा
जळगाव- संभाजीनगर मार्ग, चाळीसगाव, कन्नड, संभाजीनगर मार्गावर औट्रम घाटासाठी बोगद्याची (टनेल) मागणी खासदार स्मिता वाघ व आमदार मंगेश चव्हाण यांनी केली, यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. ही बैठक जळगाव व उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरली असून, मंत्री गिरीश महाजन यांच्या दूरदृष्टीपूर्ण मागण्यांमुळे प्रकल्पांना दिशा मिळाली आहे.