---Advertisement---
जळगाव : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यावर अखेर तोडगा निघाला असून श्वान निर्बीजीकरण मोहिमेला आता हिरवी झेंडी मिळाली आहे. मुंबई येथील उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थेची निर्बीजीकरणासाठीची निविदा महापालिकेने मंजूर केली आहे. यामुळे येत्या आठवडाभरात निर्बीजीकरण कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी मोकाट श्वानाच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून जळगावमध्ये श्वान निर्बीजीकरणाचे काम थांबले होते. यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढली होती, ज्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः गेल्या महिन्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात एका १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने निर्बीजीकरणाचा मुद्दा अधिकच ऐरणीवर आला होता.
---Advertisement---
या मोहिमेमुळे शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निर्बीजीकरणामुळे श्वानांची प्रजनन क्षमता थांबते आणि त्यांची वाढ अनियंत्रित होत नाही. यामुळे भविष्यात श्वानदंश आणि त्यांच्यामुळे होणारे इतर अपघात कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जळगावकरांना या मोहिमेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
महापालिकेकडे या कामासाठी बीड, कर्नाटक, मुंबई आणि नंदुरबार येथील विविध संस्थांनी निविदा भरल्या होत्या. तांत्रिक आणि आर्थिक बाबी तपासल्यानंतर, उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थेने सादर केलेला दर सर्वात कमी असल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे.
आता लवकरच या संस्थेशी करारनामा करून त्यांना कार्यादेश दिला जाईल. कार्यादेश मिळाल्यानंतर, पुढील आठवडाभरात प्रत्यक्ष निर्बीजीकरण मोहिमेला सुरुवात होऊ शकते, असे सहायक आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले.