---Advertisement---
राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी, पण तितकीच उत्सुकता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या मिळणाऱ्या 1500 रुपयांची रक्कम 2100 रुपये होणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
महायुती सरकार सत्तेत येऊन जवळपास एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असला, तरी सन्मान निधीत अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानंतर लाडक्या बहिणींच्या अपेक्षा पुन्हा जाग्या झाल्या आहेत.
प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले….
“1500 रुपयांचे 2100 रुपये योग्य वेळी करणार, हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आहे आणि तो आम्ही नक्की पाळू.” तसेच त्यांनी या योजनेसाठी दरवर्षी होणाऱ्या 45 हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा उल्लेख करत, ही योजना किती मोठी आणि धाडसी असल्याचंही स्पष्ट केलं. दरम्यान, या योजनेमुळे अनेक महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल झाल्याचं सांगत, लाडक्या बहिणींनीच महायुतीला 232 जागांचा ऐतिहासिक कौल दिला, असा दावाही त्यांनी केला.
राज्यातील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेने महिला वर्गात मोठी लोकप्रियता मिळवली होती.
आता प्रश्न एकच आहे – 2100 रुपये नेमके कधी? शिंदेंच्या “योग्य वेळी” या विधानाकडे राज्यातील लाडक्या बहिणी आशेने पाहत आहेत.









