जळगाव : कुत्रे निर्बिजीकरणासाठी महापालिका प्रशासनाने गत वर्षभरात तिसऱ्यांदा निविदा काढली. परंतु दराबाबत अनेक संस्था नाक मुरडत असल्याने आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे कमालीचे हतबल झाले आहेत. या हतबलतेपोटीच शहरातील कुत्रे निर्बिजीकरणाचे काम गुन्हा दाखल असलेल्या म्हणजेच नंदुरबारच्या नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्थेला देण्यात आले आहे. या प्रकारामुळे शहरातील किती कुत्र्यांचे निर्बिजीकरण होईल यात शंकाच व्यक्त केली जात आहे.
शहरातील नागेश्वर कॉलनीत एका चिमुकल्याचा पिसाळलेल्या कुत्र्यांनी लचके तोडल्याने करुण अंत झाला या घटनेनंतर शहरवासियांमध्ये महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र रोष निर्माण झाला आहे. राजकीय पक्षांनी तर खेळण्यातील भुंकणारे कुत्रेच आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना भेट देत आरोग्य विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले. अखेर दबाव वाढल्याचे लक्षात येताच मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी ‘पुन्हा ये रे माझ्या मागत्या’ या उक्तीप्रमाणे कुत्रे निर्बिजीकरणाचे काम वादग्रस्त ठरलेल्या एजन्सीला दिले आहे.

नंदुरबारच्या संस्थेबाबत तक्रारी
भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी महापालिकेने सुमारे दीड कोटी रुपयांची निविदा काढली असून, त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. तत्पूर्वीच, प्रशासनाने कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे कंत्राट मिळाल्यावर त्यात गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून या आधी पोलिसात गुन्हा दाखल असलेल्या नंदुरबारच्या वादग्रस्त संस्थेकडेच पुन्हा ते काम सोपविले आहे. अमरावतीच्या संस्थेने अर्ध्यातच काम सोडल्यानंतर २०२१ मध्ये जळगाव महापालिकेतर्फे शहरातील म काट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे कंत्राट नंदुरबार येथील नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्थेला देण्यात आले होते. नियमानुसार भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाल्यानंतर त्यांना रेबीजविरोधी इंजेक्शन देऊन कानावर निशाणी करून जेथून पकडले त्या ठिकाणी परत सोडण्याची जबाबदारी संबंधित संस्थेकडे होती. मात्र, नागरिकांकडून ही संस्था अटी व शर्तीनुसार काम करत नसल्याच्या तक्रारी होत्या.
निविदा मंजूर होईपर्यंत काम गुन्हा दाखल असताना, महापालिका प्रशासनाने पुन्हा त्याच संस्थेला जळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम दिले आहे. दरम्यान, यापूर्वी तीन वेळा निविदा प्रसिद्ध करूनही कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. आताही एक हजार ६५० रुपये दरानुसार कोणीच कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. निविदा मंजूर होत नाही तोपर्यंत कुत्र्यांचे निर्बिजीकरण सुरू राहिले पाहिजे, या उद्देशानेच नंदुरबारच्या संस्थेला तात्पुरत्या स्वरूपात काम दिले असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. या संस्थेने शहरातील विविध भागातून भटकी कुत्री पकडून आणल्यानंतर त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्यात निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून चौकशी
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्तांनी चौकशी केली असता. निर्बिजीकरण झालेल्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी तफावत आढळून आली. साहाय्यक पशुसंवर्धन आयुक्तांच्या तक्रारीवरून अखेर कंत्राटदार संस्थेच्या विरोधात त्या वेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता.