---Advertisement---
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील जळगावसह सात जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, अहिल्यानगर, नंदूरबार, जळगाव, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुढील तीन दिवस दुपारी चार वाजेनंतर अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळू शकतात. काही ठिकाणी हलका पाऊस होईल, तर काही भागांत अचानक जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
या काळात वाऱ्याचा वेग ताशी सुमारे ४० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, जागतिक हवामानातील बदल, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वाढते तापमान, तसेच बाष्पाचे वाढते प्रमाण यामुळे ढगांची दाटी होत आहे. याशिवाय उत्तरेकडून सक्रिय झालेला पश्चिमी विक्षोभही या अवकाळी परिस्थितीस कारणीभूत ठरत आहे.
दरम्यान, नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.









