जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथे महावितरणच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान एका मजुराचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. अशोक तिजू पुराम (वय ३९, रा. सुकडी, ता. देवरी, जि. गोंदिया, सध्या मुक्काम भादली रोड) असे मृत मजुराचे नाव आहे.
घटनास्थळी काय घडले?
महावितरणने भारत इलेक्ट्रिक कंपनी, कुपवाड (जि. सांगली) यांना विविध कामांचे कंत्राट दिले आहे. या कंपनीच्या देखरेखीखाली बुधवारी (दि. २०) सकाळी नशिराबाद येथे महावितरणचे काम सुरू होते. कंपनीचे सुपरवायझर हर्षल कदम (रा. खेडी) यांच्या सांगण्यानुसार, मजूर बाजारपट्टा भागात काम करत होते.
यावेळी अशोक पुराम हे विद्युत खांबाजवळ काम करत असताना अचानक खांबात विद्युत प्रवाह उतरला आणि त्यांना जबरदस्त शॉक बसला. या धक्क्याने ते जागीच कोसळले. सोबतच्या मजुरांनी तात्काळ त्यांना उचलून उपचारासाठी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
या घटनेची माहिती मिळताच मृत अशोक पुराम यांच्या कुटुंबीयांना गोंदिया येथे कळविण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या मूळ गावी सुकडी येथे रवाना करण्यात आला. अशोक पुराम यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, मजुर सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
पोलीस तपास सुरू
या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजेचा प्रवाह खांबात का उतरला? याची चौकशी करण्यात येत असून, महावितरणच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी होत्या का, याचा तपास पोलीस आणि महावितरण प्रशासन करत आहे.