जळगाव : महाराष्ट्र राज्याचा रेल्वे इतिहासात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. मागील ५३ वर्षांपासून प्रवाशांच्या विश्वासाचा हक्काचा प्रवास ठरलेली महाराष्ट्र एक्सप्रेस (गाडी क्रमांक ११०४०) आता अत्याधुनिक एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) कोचेससह सेवेत दाखल झाली आहे. नव्या अवतारात दाखल झालेल्या या गाडीचे आज जळगाव रेल्वे स्थानकावर भाजप रेल्वे प्रकोष्टतर्फे लोको पायलटचे पुष्पगुच्छ देऊन आणि पेढे वाटून उत्साहात स्वागत करण्यात आले.
रविवार १ जूनपासून सुरू झालेल्या या बदलामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. या ऐतिहासिक बदलामागे जळगावच्या खा. स्मिताताई वाघ यांचा अथक पाठपुरावा आणि दूरदृष्टी आहे. त्यांनी थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन महाराष्ट्र एक्सप्रेससाठी एलएचबी कोचेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले असून, त्यांच्या या योगदानामुळे महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना आधुनिक रेल्वे प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
या महत्त्वपूर्ण बदलाचे औचित्य साधून, ३ जून रोजी जळगाव रेल्वे स्थानकावर एका उत्साहात स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र एक्सप्रेसच्या लोको पायलटचे फुलांनी स्वागत करण्यात आले आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जळगाव भाजप रेल्वे प्रकोष्ठ आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह धरणगाव तालुका प्रवासी मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे, माजी महापौर सीमाताई भोळे, भाजप रेल्वे प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष प्रतीक शेठ गुजराथी, रेल्वे समितीचे सदस्य महेंद्र कोठारी आणि स्टेशन उपाधीक्षक अरुण नाफडे यां मान्यवरांची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून महाराष्ट्र एक्सप्रेसला नव्या रूपात पुढील प्रवासासाठी रवाना केले.
यावेळी उपस्थित जळगाव भाजप रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ सदस्य आणि धरणगाव तालुका प्रवासी मंडळाच्या सदस्यांनी या बदलाचे स्वागत केले. गोपाळ भंगाळे, रोहित वाघ, रेखा कुलकर्णी, गोविंद लाठी, अशोक गाडगे, शरद मोरे, स्वप्नील सकलिकर, प्रकाश पंडित, आनंद जैन, भूषण भोळे, अल्पेश कोठारी, मुविकोराज कोल्हे, योगेश पाटील, निलेश तायडे, तसेच महेंद्र कोठारी (अध्यक्ष, धरणगाव तालुका प्रवासी मंडळ), रविन्द्र भागवत (उपाध्यक्ष), एस डब्लू पाटील (सचिव), किरण वाणी (सह सचिव), डॉ. मिलींद डहाळे, आनंद बाचपाई, ललित येवले, हितेश पटेल, सुनिल चौधरी, किरणसिंह परिहार, दिनकर पाटील, संतोष सोनवणे, सुशिल कोठारी आणि सुदाम चौधरी यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते आणि प्रवासी उपस्थित होते. एलएचबी कोचेसमुळे आता महाराष्ट्र एक्सप्रेसचा प्रवास केवळ आरामदायीच नाही, तर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अधिक सक्षम झाला आहे. हा बदल महाराष्ट्राच्या रेल्वे विकासातील एक मैलाचा दगड ठरणार आहे.
